कोल्हापूर (Pclive7.com):- कोल्हापूर उत्तरच्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी मैदान मारलं आहे. भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांना मोठी धोबीपछाड देत १८८०० मतांनी जाधव यांनी या विजयाची नोंद केली आहे. जयश्री जाधव यांना ९६२२६ मते मिळाली. तर सत्यजीत पाटील यांना ७७४२६ मते मिळवता आली.
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणुक लागली होती. सुरूवातीला ही निवडणूक बिनविरोधी करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र भाजपने या जागेवर जयश्री पाटील यांना भाजपकडून लढण्याची ऑफर दिली. मात्र जयश्री पाटील यांनी भाजपकडून लढण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने या जागी सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली. तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील हे या निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात ठाण मांडून बसल्याचे दिसून आले. या पोटनिवडणुकीत अनेक नाट्यमय घाडामोडी घडताना दिसून आल्या.
अंतिम फेरीत आलेली आकडेवारी
मतमोजणीच्या एकूण २६ फेऱ्या पार पडल्या आहेत. यात सुरूवातीपासूनच जयश्री पाटील या आघाडीवर होत्या. शेवटच्या २६ व्या फेरीपर्यंत एकूण १८८०० मतांनी जयश्री जाधव विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर कोल्हापुरात जल्लोष सुरू झाला. सतेज पाटील यांनी ही जागा काँग्रेसच्या गोटात पुन्हा यावी यासाठी मोठी फिल्डिंग लावली होती. सुरूवातील शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांची उघड नाराजी दिसून आली होती. त्यानंतर मात्र काँग्रेसला त्यांची नाराजी दूर करण्यात मोठं यश आल्याने हा विजय काँग्रेससाठी आणखी सोपा झाला आहे.