पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा राज्याचा निकाल बुधवारी (दि.८) रोजी ऑनलाइन जाहीर झाला. पिंपरी चिंचवड शहराचा निकाल ९४.६४ टक्के लागला आहे. शहराचा गेल्या वर्षी मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर केलेला परीक्षेचा निकाल ९९.८६ टक्के इतका लागला होता.
यंदा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली होती. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या १७ हजार ७९६ विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ७०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये १६ हजार ७५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या ७ हजार ७६१ असून मुलांची संख्या ८ हजार ९९५ एवढी आहे. मुलींचा निकाल ९५.४२ टक्के इतका आहे. मुलांचा निकाल ९३.९८ इतका आहे. तर निकालात यावेळीही मुलींनी आघाडी घेतली आहे..
मावळचा निकाल ९०.५६ टक्के
मावळ तालुक्याचा निकाल टक्के ९०.५६ टक्के लागला आहे. या वर्षी मावळमधील ४ हजार ६९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी ३ हजार ६६८ मुले- मुली उत्तीर्ण झाली. यामध्ये १ हजार ८९२ मुले व १ हजार ७७६ मुली होत्या. मुलींचा निकाल ९२.८८ टक्के तर इतका मुलांचा निकाल ८८.४९ टक्के आहे. मावळमध्ये देखील निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
निकाल दुपारी एक वाजता जाहीर झाला. त्यामुळे आता स्मार्टफोनच्या जमान्यात मोबाईलवर ऑनलाइन निकाल पाहण्यास विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली होती. तर काहींनी कॉलेजमध्ये जावून निकाल पाहून प्रिंट देखील घेतली. कारण कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी आणि अर्ध्याच्यावर वर्ष संपल्यानंतर सुरू झालेले ऑफलाइन वर्ग यामुळे यावर्षी किती गुण मिळले असतील याविषयी विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. दुपारी एक नंतर निकालाची साईट ओपन झाल्यावर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन निकाल पाहिला आणि उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात सुटकेचा नि:श्वास सोडला.