पिंपरी (Pclive7.com):- भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखालील रस्त्यालगत असणाऱ्या हातगाडीधारक आणि फेरीवाल्यांना तात्काळ पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल डोळस यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे आयुक्त राजेश पाटील व ‘इ’ क्षेत्रीय अधिकारी यांना डोळस यांनी निवेदन दिले आहे.
कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी रस्त्यावर फळे विक्री व इतर व्यवसाय करावा लागत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून त्यांना ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या अंतर्गत अतिक्रमण विभागामार्फत रस्त्यावर विक्री करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. सदर कारवाई करत असताना त्यांचे फळ मालांचे व इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा सतत कारवाईमुळे त्यांचे नुकसान होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे.
तरी आयुक्तांनी तातडीने या लोकांसाठी पर्यायी जागा द्यावी. जेणेकरून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील. तरी लवकरात लवकर त्यांना पर्यायी उपलब्ध जागा देऊन त्यांच्यावर होणाऱ्या त्रासास मुक्ती देऊन या गोरगरिबांना न्याय मिळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल डोळस यांनी निवेदनात केली आहे.