आळंदी (Pclive7.com: प्रसाद बोराटे):- आळंदी नगरपरिषद सभागृह येथे दि.२८ रोजी सकाळी साडे अकरा वाजता दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आळंदी नगरपरिषद आणि जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांच्या वतीने शहरातील युवक-युवती साठी रोजगार मेळावा व हर घर तिरंगा उपक्रम बाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक/युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशीलतेला कालानुरूप वाव देणारी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने बाबत ऋतुराज सूर्य, उद्योग आधिकारी जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था हडपसर, पुणे यांचे मार्फत विविध प्रशिक्षण मोफत देण्यात येतात. यामध्ये उद्योजकांसाठी विकास प्रशिक्षण याबाबत श्रीमती वैशाली पाटील सहाय्यक प्रकल्प आधिकारी, आळंदी नगरपरिषद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव येत आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरूपी मनात रहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधी मध्ये देशभरात हर घर तिरंगा झेंडा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घर व इमारतीवर राष्ट्रध्वज उभारणेसाठी व तिरंगा स्वइच्छेने विकत घेण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याकरिता अर्जुन घोडे, समुदायक संघटक, आळंदी नगरपरिषद यांनी उपस्थितांना हर घर तिरंगा या उपक्रमाबाबत माहिती दिली.
जिल्हा उद्योग केंद्र पुणे व DAY NULM अभियान कक्ष आळंदी नगरपरिषद यांचे मार्फत ३० लाभार्थ्यांचे अर्ज कर्ज मागणीसाठी भरून घेण्यात आले. Mahabank-RSETI हडपसर, पुणे यांचे मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम याविषयी बँक पदाधिकारी यांनी सभागृहात जमलेल्या नागरिकांना त्या योजनेअंतर्गत आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती देत, मार्गदर्शन केले व त्याच्या अटी नियम इ.सविस्तर माहिती त्यांनी सांगीतली. तसेच नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्न अडचणी याबाबत त्यांनी उत्तरे दिली. या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती संख्या जास्त होती.
या कार्यक्रमा वेळी ऋतुराज सूर्य उद्योग आधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र पुणे, श्रीमती मयुरी खेडेकर व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया, प्रेरणकुमारी व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया, आर बी माने, प्रतिनिधी स्टेट बँक ऑफ इंडिया, सुनील यादव व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया, देवेंद्र बारसकर व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, वैशाली पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी आळंदी नगरपरिषद, अर्जुन घोडे समुदाय संघटक आळंदी नगरपरिषद, पत्रकार ज्ञानेश्वर कुऱ्हाडे तसेच योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.