नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात विद्यार्थ्यांची शूर जवानांना मानवंदना
पिंपरी (Pclive7.com):- “मातृभूमीच्या रक्षणासाठी पराक्रमाची उंची गाठणाऱ्या आपल्या देशाच्या शूर सुपुत्रांना प्रत्येकाने सलाम केला पाहिजे. भारतीय जवानांनी पराक्रम व शौर्याच्या जोरावर २६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्ध जिंकले. कारगिल विजय आणि त्या निमित्ताने साजरा होणारा हा दिवस भारतासाठी अभिमान आणि गौरवाचे प्रतीक आहे”, असे प्रतिपादन नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी केले.
चिंचवड, संभाजीनगर येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात कारगिर विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतीय सशस्त्र दलातील हुतात्म्यांना विविध उपक्रमांव्दारे भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अमित गोरखे बोलत होते. या कार्यक्रमासाठी कार्यकारी शाळेच्या व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, प्राचार्य डॉ. मानसी हसबनीस, तांत्रिक प्रमुख श्री. समीर जेऊरकर यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्शल कॅडेट फोर्स (एमसीएफ) च्या जवानांनी प्रशिक्षण दिले. शाळेतील गायकांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी “गलत मत कदम उठाओ” हे गीत सादर केले. इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. देवंशी करमरकर हिने या दिवसाचे महत्त्व सांगून सैनिकांचे बलिदान ओळखण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या नाट्यरसिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी सर्वांना “कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा” दिल्या. वंदे मातरम् ने या कार्यक्रमाची सांगता झाली.