संभाजीनगर, शाहूनगर, पुर्णानगर, शिवतेजनगर परिसरात 50 हजार राष्ट्रध्वजाचे वितरण
पिंपरी (Pclive7.com):- भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणारांचे, क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे आणि देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होवून बलशाही भारत घडविण्यासाठी एकसंघ होवूया, असे आवाहन भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील संभाजीनगर, पुर्णानगर, शाहूनगर, शिवतेजनगर, कृष्णानगर सह अन्य परिसरातील नागरिकांना हर घर तिरंगा उपक्रमातून सुमारे 50 हजार राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, विविध सोसायटीचे चेअरमन, सचिव, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवार म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रप्रेमाने भारावलेली पिढी होती, स्वातंत्र्यानंतर देशाला स्वयंपूर्ण करण्याचे ध्येय समोर असलेली पिढी होती, तर आज देशाला विश्वगुरू पदापर्यंत पोहोचविण्याची क्षमता असलेली पिढी देशाला पुढे नेत आहे. जागतिक स्तरावर देशाला विकासाकडे घेऊन जाताना त्यांची नाळ राष्ट्राशी जोडण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून करण्यात येत आहे. बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्याचा हा उपक्रम निश्चितपणे यशस्वी ठरेल.
हर घर तिरंगा उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनात आणखी राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होईल. या माध्यमातून ज्ञानाधारित समाजव्यवस्था निर्माण होत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचे समग्र व्यक्तिमत्व घडायला हवे. राष्ट्र घडविण्यासाठी समाजाविषयी जाणीव असलेले विद्यार्थी निर्माण करणारी व्यवस्था अनुकूल परिवर्तन घडवू शकते. अशा उपक्रमाच्या माध्यमातून युवा पिढीला समाजाशी जोडून ते राष्ट्राची प्रगती करण्यात मोलाचा वाटा उचलतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.