पिंपरी (Pclive7.com):- भारताविरोधात अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान मधील “कराची” शहराचे नाव “पिंपरी” मधून हटवा या मागणीसाठी अपना वतन संघटनेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी पुणे, पिंपरी चिचंवड पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांना देण्यात आले होते.
पिंपरी मध्ये “कराची भवन” नावाची दोन हॉटेल आहेत, तसेच एक कराची स्वीट आहे. सदर नावे तात्काळ बदलण्यात यावीत यासाठी अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरी येथील शगुन चौकात “तिरंगा आंदोलन” करण्यात आले होते. यावेळी बोलताना अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी सांगितले कि, पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारत-पाक सीमारेषेवर गोळीबार करीत आहेत, सीमेवरील गावांमध्ये अशांतता पसरवण्याचे काम करीत आहे. पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये आजपर्यंत हजारो जवान शहीद झालेले आहेत. तसेच अनेक नागरिकांचा बळी गेलेला आहे. शिवाय भारतीय नौदल निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबतीत पाकिस्तान भारताला सहकार्य करीत नाही, असे असताना पाकिस्तानातील कराची हे नाव पिंपरीतील हॉटेलला देण्याचे काही एक कारण नाही. त्यामुळे संबंधित मालकांनी “कराची” हे नाव तात्काळ हटवावे अन्यथा समस्त देशप्रेमींच्यावतीने कराची नाव हटवण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी आरपीआय वाहतूक आघाडीचे अजिजभाई शेख यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्या हॉटेलवर कारवाई करण्यासाठी काही वेळ द्यावा. पोलिसांकडून चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक बोबडे यांनी दिल्याने सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
या आंदोलनामध्ये अपना वतन संघटनेच्या महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर, शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा, भीमशाही युवा संघटनेचे शिवशंकर उबाळे, रौफ शेख, दीपा बनसोडे, तौफिक पठाण, ऍड फारुख शेख, संजय बनसोडे, मलंग शेख, अयुब इनामदार, मुस्तफा तांबोळी, फिरोज शेख, प्रकाश पठारे, दीपक खैरनार, शिव सावंत, गणेश जगताप, विशाल बोत्रे, गणेश अडागळे आदीजण उपस्थित होते.