पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातून सत्ता गेल्यानंतर एका मेळाव्याच्या निमित्ताने शहरात आलेले अजित पवार पुन्हा शहरात येत आहेत. पण अजित पवारांची ही भेट महापालिका अधिकाऱ्यांच्या झाडाझडतीसाठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेतून बाहेर पडली असली तरी राष्ट्रवादीने मंजूर केलेले अनेक प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांची कामे झाली, पण सत्ता परिवर्तनानंतर मात्र ही सर्व कामे रखडली आहेत. त्याच बरोबर राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांच्या प्रभागात कामे होत नसल्याची तक्रार ही आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी दि.२९ रोजी अजित पवार सकाळी साडेनऊच्या सुमाराला महापालिकेत येणार आहेत. या भेटीत ते आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
सत्तेतून बाहेर पडलो तरी पिंपरी चिंचवडवरचे प्रेम कायम आहे आणि शहरवासीयांच्या हितासाठी अजून ही तेवढाच तत्पर असल्याचा संदेश ही अजित पवार या भेटीच्या निमीत्ताने देण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी तसे सूतोवाच ही केले आहे. महापालिकेतील सत्ता गेली आहे, राष्ट्रवादीची ताकत कमी झाली आहे. परंतू पूर्णपणे राष्ट्रवादीची ताकद घटलेली नाही. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी सुधारता यावी या उद्देशाने ही भेट महत्वपूर्ण ठरणार आहे.
दरम्यान, भाजपने महापालिकेत सत्तेचे सहा महिने पूर्ण केले आहेत. पण त्यांना शहरात अजूनही म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही. उलट पत्रकारांना दमबाजी, ठेकेदारांकडून पैसे मागण्याची पंतप्रधान कार्यालयाला झालेली तक्रार, ताडपत्री घोटाळा यामुळे भाजपची प्रतिमा मालिन झालेली आहे. काही अपवाद वगळता भाजपकडून अपेक्षित काम झालेले नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये हळूहळू नाराजी पसरू लागली आहे. त्याचा फायदाही उठवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे आणि ही भेट त्याचाच एक भाग असल्याचे राष्ट्रवादीचे नेते खाजगीत सांगत आहेत.
अजित पवार यांची ही भेट स्थानिक नेत्यांसाठी आणि पक्षासाठीही महत्वाची ठरणार आहे यात शंका नाही. पण अशी चार सहा महिन्यातून एखादी भेट घेण्यापेक्षा अजित पवार यांनी पूर्वीप्रमाणे शहरात पुन्हा लक्ष घातले तर त्यांची गेलेली ताकत मिळायला नक्कीच मदत होणार आहे. पण ते लक्ष देतील का हे लवकरच कळेल पण तूर्तास त्यांच्या नियोजित भेटीमुळे राजकीय वातावरण मात्र तापले आहे.!