पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरात दररोज संकलित होणा-या घनकच-यावर रासायनिक प्रक्रिया करून विद्युत निर्मिती करण्यासाठी (वेस्ट टू एनर्जी) महापालिका प्रशासनाने अखेर निविदा काढली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कार्यवाहीला सुरूवात झाली असून, लवकरच कचरामुक्त शहराचे स्वप्न साकार होणार आहे.
भोसरी विधानसभा निवडणूक आणि महापालिका निवडणुकी दरम्यान आमदार महेश लांडगे यांनी मोशी, चऱ्होली आणि इंद्रायणीनगर परिसरातील नागरिकांना कच-यापासून होणारा त्रास कमी करणार.तसेच, शहरातील कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जर्मनीतील प्रकल्पाच्या धर्तीवर कच-यापासून वीज निर्मीती प्रकल्प सुरू करणार, असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आमदार लांडगे यांनी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला आहे. महापालिका प्रशासनाने ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे मोशी, च-होली, इंद्रायणीनगरसह शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर म्हणाले की, महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, कोल्हापूर आदी मोठ्या शहरांमध्ये कच-यापासून इंधन निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. शहरातील कच-यासमस्या पूर्णत: सोडविण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करीत आहे. कचरा स्त्रोतस्तरावर त्याचे विलगीकरण व्हायला पाहिजे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करुन त्याचे घरोघरी संकलन प्रक्रिया सक्षम केली जाणार आहे. सध्यस्थितीला शहरात ६०० ते ८०० मेट्रिक टन इतका कचरा संकलित होत आहे. त्यापैकी ओला कचरा, हॉटेल वेस्ट आदी वेगळा केला. तर सुमारे ५५० मेट्रिक टन कच-यावर प्रक्रिया करता येईल. त्यामाध्यमातून सुमारे ११ ते १२ मेगावॅट वीज निर्मिती होवू शकते. ओला कचरा वेगळा करून त्याचे कंपोस्टिंग करण्यात येणार आहे. उर्वरित कच-यापासून वीज निर्मितीचा संकल्प आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुमारे १८ महिन्यात प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
शहरासाठी प्रकल्प महत्त्वाचा- संजय कुलकर्णी
पिंपरी चिंचवड शहरात संकलित होणा-या घनकच-यावर प्रक्रिया होणे काळाची गरज आहे. महापालिका आयुक्तांनी पूर्ण आभ्यास करूनच हा प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. जगभरात असे प्रकल्प यशस्वीपणे राबविले जातात. चीन, जपान, जर्मनीत असे प्रकल्प आहेत. देशात दिल्ली, हरियानामध्ये असे प्रकल्प आहेत. आंध्रप्रदेश सरकारनेही आंतरराष्ट्रीय निविदा काढली आहे. शहराच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे कचरा प्रश्न निकालात काढण्यासाठी हा प्रकल्प व्हावा, अशीच भूमिका प्रशासनाची आहे, अशी माहिती पर्यावरण विभागाचे अधिकारी कुलकर्णी यांनी दिली.
शहरवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करणार- आमदार लांडगे
शहरातील कचरा प्रश्न निकालात काढण्यासाठी ‘वेस्ट टू एनर्जी’ हा प्रकल्प अत्यंत हितकारक आहे. शहरातील कचरा प्रश्नी शून्य कचरा प्रकल्प, वेस्ट टू एनर्जी, ‘निरी’ संस्थेने सूचविलेल्या उपायांप्रमाणे मोशी कचरा डेपोच्या बाजूने ग्रीन बेल्ट तयार करणे अशी अनेक कामे आगामी काळात मार्गी लावण्यात येणार आहेत. दिवसें-दिवस वाढत जाणारा कचरा, त्यामुळे परिसरात पसरलेली दुर्गंधी अशा अनेक समस्या आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील. शहरातील नागरिकांच्या अपेक्षांची पूतर्ता करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.