पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांना दररोज पाणीपुरवठा करावा. तसेच थांबलेला महापौर निधी प्रशासक म्हणून पुन्हा चालू करावा अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली. शिवसेना नेत्या सुलभा उबाळे आणि माजी नगरसेविका मीनल यादव यांच्या नेतृत्वात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले.
माजी नगरसेविका मीनल यादव म्हणाल्या की, शहरवासीयांना सध्या दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. तीन ते चार वर्षांपासून संपूर्ण शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पिंपरी- चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण १०० टक्के भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पण, नागरिकांना दररोज पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. आता दसरा, दिवाळी जवळ आली आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे. महापालिका प्रशासनाने तत्काळ दररोज पाणीपुरवठा सुरू करावा.
यावेळी महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांचे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेविका मीनल यादव, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, उपशहरसंघटिका वैशाली कुलथे, रजनी वाघ, विभागसंघटिका बेबी सय्यद, कोमल जाधव, शिल्पा अनपन, अश्विनी खंडेराव, प्रांजल पाडेकर, स्मिता पाटील, शोभा मोरे आदी उपस्थित होते.