पिंपरी (Pclive7.com):- राज्यात खाजगी प्रवासी बसेस जळण्याच्या दुर्घटनेत वाढ आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात कोणतीही घटना घडू नये म्हणून मनसे वाहतूक सेना आक्रमक झाली आहे. शहरातील सर्व अनधिकृत बस वाहतुकीवर ८ दिवसांच्या आत कडक कार्यवाही करण्यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा परिवहन विभागाला देण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या शिष्टमंडळाने परिवहन विभागातील अधिकार्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात काही दिवसांपासून आराम बस जळण्याच्या व दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढत आहेत. थोड्या दिवसापूर्वी नाशिक येथे आराम बस आणि ट्रक या मध्ये अपघात होऊन बस मधील १२ जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. त्याच दुर्घटनेनंतर २ ते ३ दिवसानंतर मुंबई भीमाशंकर मार्गावर एक आराम बस जळून खाक झाली होती. यात कोणतीही जीवितहाणी झाली नाही.
या सदर वाहने सुव्यवस्थित नसल्यामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याचे प्रमाण फार मोठ्या असून, त्या बस मालकांचे व्यवसाय चालण्यासाठी बस मधून अवैधरित्या क्षमते पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जाते. सदर गाड्यांना परवानगी नसतानाही त्या गाडीच्या डिग्गी मधून माल वाहतूक, मोटर सायकल, ज्वलनशील पदार्थांची वाहतूक केली जाते. हे सर्व राजरोपणे चालू असताना प्रशासनाचा व या बस व्यावसायिकांच्या आर्थिक फायद्यासाठी सर्व सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे.
तरी या सर्व अनधिकृत बस वाहतुकीवर आठ दिवसांच्या आत परिवहन विभागातर्फे कडक कार्यवाही करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले. या व्यतिरिक्त पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या अवैध रिक्षा, स्क्रॅप रिक्षा, ओव्हरलोड वाहतुकीवर कार्यवाही, अवैध प्रवासी वाहतूक, स्कूल बसची तपासणी करण्यात यावी आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
या वेळेस नगरसेवक सचिन चिखले, मनसे वाहतूक सेना अध्यक्ष सुशांत साळवी, उपाध्यक्ष नितीन सुर्यवंशी, कृष्ण महाजन, दत्ता देवतरासे, नितीन चव्हाण, रोहिदास शिवनेकर, गणेश वाघमारे, जय सकट, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते.