पिंपरी (प्रतिनिधी):- निळू फुले यांनी अभिनयाच्या क्षेत्रातील ठराविक चाकोरीच्या बाहेर जाऊन आपला अभिनय सादर केला. त्यांनी खर्डा आवाजाच्या माध्यमातून महाराष्ट्राला धरून ठेवलं. निळू फुलेंनी सहकलाकारांना कधीच खालची वागणूक दिली नाही. त्यांच्या सारखा सच्चा मनाचा असा माणूस पुन्हा होणे नाही असे परखड मत जेष्ठ मराठी सिने अभिनेता अशोक सराफ यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आयोजित निळू फुले कला महोत्सवाचे उद्घाटन आज अशोक सराफ यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार लक्ष्मण जगताप, आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार, लिला गांधी, सुहासिनी देशपांडे, रामदास फुटाणे, माजी आमदार उल्हास पवार, प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, नगरसेविका माधवी राजापूरे, सिमा चौगुले, अनुराधा गोरखे, शर्मीला बाबर, नगरसेवक सागर अांघोळकर, शितल शिंदे, तुषार कामठे, पंडित उपेंद्र भट, सुरेश देशमुख, सह शहर अभियंता प्रविण तुपे, संजय कांबळे, शिरीष पोरेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अशोक सराफ म्हणाले की, मला आणि निळू फुलेंना महाराष्ट्राने ‘सासुरवाशीण’ या चित्रपटात प्रथम पाहिले. पण या चित्रपटात आम्ही एकमेकांना एक शब्दही बोललो नाही. त्यानंतर जी भेट आणि संवाद झाला तो कायमचाच. अशा आठवणी अशोक सराफ यांनी मांडल्या. निळू फुले मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीसाठी लढणारे मोठे लढवय्ये होते. कमी शब्दात जास्त अभिनय ही त्यांची खासियत होती. पिंपरी चिंचवड शहरात निळू फुले यांच्या नावाने नाट्यगृह सुरू होणे म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये देखील उत्तम नाट्यरसिक राहतात याची प्रचिती आहे, असेही अशोक सराफ म्हणाले.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराची तुलना यापूढे पुण्यासोबत न करता मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहराशी करावी असे सांगत पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ सुरू करणार असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.
उल्हास पवार म्हणाले की, निळू फुले यांनी वाचनातून जीवन घडवले. माळीकाम करत त्यांनी विविध विषयांवर प्राविण्य मिळविले. त्यांच्या अभिनयात मोठे सामर्थ्य होते.
निळू फुले यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, लीला गांधी यांनी निळू फुले यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या. लावणीतली वाघीण म्हणून ओळखल्या जाणा-या लीला गांधी निळू फुले यांच्या बद्दल बोलताना भावुक झाल्या.
चित्रपट निर्माते रामदास फुटाणे यांनीही निळू फुलेंच्या चौरंगी व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला. बर्लिन येथील भिका-याला निळू फुलेंनी भीक देऊन इंग्रजांना भीक दिल्याची भावना व्यक्त केलेली आठवण सांगताच सभागृहात चांगलाच हशा पिकला. महापौर नितीन काळजे म्हणाले,या नाट्यगृहाच्या माध्यमातून निळू फुले यांना अभिवादन केले आहे.स्थानिक कलाकारांनाही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले,आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रयत्नातून नाट्यगृह झाले आहे.निळू फुले यांच्या जीवनावर कला महोत्सव त्यांच्या कल्पनेतून सुरु झाला.यापूढेही असे उपक्रम घेवू.यापूढे तीन ते पाच दिवसाचा महोत्सव घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक सहशहर अभियंता प्रविण तुपे यांनी केले .आभार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी व्यक्त केले.