पिंपरी (Pclive7.com):- गुणवत्तेच्या निकषावर जेंव्हा पुरस्कार दिला जातो तेंव्हा तो खरा गुणवंत शिक्षक पुरस्कार असतो. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण, सांस्कृतिक कार्य, युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, सिने अभिनेते राहूल सोलापुरकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसदस्य शैलेश उर्फ शैलेंद्र मोरे, शीतल उर्फ विजय शिंदे, सुरेश भोईर, प्रशासन अधिकारी बजरंग आवारी आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना तावडे म्हणाले, शिक्षकांकडून ज्ञानदानाच्या स्वाभाविक अपेक्षा असतात. सर्वच अपेक्षा शिक्षकांकडून असणे हि बाब जरी खरी असली तरी सर्वच कामे शिक्षकांना देणे योग्य नाही. शिक्षकांना पुरक जबाबदारीचे काम देणे हे पदाधिकारी, नगरसदस्य व अधिकारी यांचे आहे. शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देताना शाळा ए ग्रेड व प्रगत स्थितीत असली पाहिजे. शाळेचा निकाल ८० टक्केच्यावर वाढला पाहिजे याकडे शिक्षकांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. शासनाने विद्यार्थ्यांसाठी ऍक्टीव्हीटी लर्नींग चालू केली आहे. जुन्नर येथील शिक्षकांच्या प्रयत्नामुळे सुमारे चौदा हजार मुले इंग्रजी माध्यमातुन मराठी माध्यमाच्या शाळेत आली. त्या शिक्षकांचा नागपूर येथील अधिवेशनात कौतुक करण्यात आले. आधार कार्ड लिंकमुळे विद्यार्थ्यांची निश्चित पटसंख्या कळेल. शाळेत मुले टिकली पाहिजे यासाठी प्रशासनाने गांर्भियाने विचार करावा. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांवर महापालिका व शासन मोठया प्रमाणावर खर्च करते. त्याचा परतावा मिळायला हवा. महापालिका शाळेत विद्यार्थी संख्या वाढविण्याचे आव्हान शिक्षकांनी स्विकारावे व त्यासाठी प्रयत्न करावे त्यास शासन व महापालिका बळ देईल. असे काम करणा-यांचा सत्कार होणे संयुक्तीक ठरेल. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी विविध उपक्रम राबवून जाणिवपुर्वक प्रयत्न केल्यास शिक्षकांवरचा विश्वास दृढ होईल. असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी मनपा व खाजगी शाळेतील २१ गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये जयश्री जाधव, डॉ. उर्मिला फलफले, दिलिप थोरात, विठ्ठल बगाटे, संगिता आव्हाड, संगिता चटणे, जोत्सना चौधरी, रविंद्र लाड, वंदना सावंत, सुहासिनी शिंदे, विनोद फंड, अर्चना गोरे, सविता ट्रॅविस, रुबिका खरात, स्वाती ताम्हाणकर, विजयालक्ष्मी हाके, दिपाली शिंदे, शामला पंडित, अमोल नवलपुरे, शंकर वाल्हेकर, सुनिता घोडे यांचा समावेश आहे.
तसेच यावेळी महापालिकेच्या माता रमाबाई भिमराव आंबेडकर प्राथमिक कन्या शाळा अजंठानगर व प्राथमिक शाळा मोशी मुले क्र.१०६ तसेच खाजगी शाळांमध्ये क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती संचालित खिंवसरा पाटील विद्यामंदिर गणेशनगर, थेरगांव व गणेश इंग्लिश मिडीयम दापोडी या शाळांचा आदर्श शाळा म्हणून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश वाळुंज यांनी तर आभार किशोर केदारी यांनी मानले.