पिंपरी (Pclive7.com):- सचिन प्रभाकर सानप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री काशी विश्वनाथ दर्शन यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. भोसरी विधानसभा क्षेत्रातील ७०० नागरिकांची काशी यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली. आपल्या हिंदू परंपरेमध्ये हिंदू तीर्थक्षेत्रांचे दर्शन घ्यायची प्रत्येकाला आस असते, भूक असते. हे दर्शन घेतल्यानंतर माणूस धन्य होतो, एक आत्मिक समाधान या ठिकाणी जाऊन प्रत्येकाला मिळत असते. गेलेले नागरिक हे आत्मिक समाधान घेऊन समाधानी झाल्याचे चित्र या यात्रेच्या निमित्ताने पहायला मिळाले.
भोसरी विधानसभा क्षेत्रातील कृष्णानगर, महात्मा फुलेनगर, यमुनानगर, चिखली, संभाजीनगर व शहराबाहेरील सुद्धा नागरिकांसाठी आयोजित केलेल्या या महातीर्थ काशी विश्वनाथ दर्शन यात्रेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ७०० नागरिकांना काशीयात्रा घडली. काशी यात्रेच्या या संपूर्ण प्रवासात यात्रेचे आयोजक सचिन प्रभाकर सानप यांचे संपूर्ण कुटुंब भाविकांच्या समवेत होते. या दरम्यान प्रत्येक भाविकाची आपुलकीने काळजी घेतली गेली.
या संपूर्ण यात्रेत नागरिकांना संपूर्ण सहा दिवस अत्यंत रुचकर व स्वादिष्ट महाराष्ट्रीयन पद्धतीचा नाष्टा, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण दिले. तसेच वाराणसी येथे पोहचल्यानंतर बनारस स्टेशनवर काशी विश्वनाथाच्या जयघोषात व बँड बाजा वाजवत प्रत्येकाच्या गळ्यात पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले आणि तेथून निवासस्थानापर्यंत (जंगमवाडी मठ) वाहतूक व्यवस्था, निवासाची सोय, जेवण, दर्शन, आरती अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यात्रेस आलेल्या जेष्ठ नागरिकांची विशेष खबरदारी घेण्यात येत होती. वैद्यकीय सेवा देणारे कार्यकर्तेही भाविकांच्या सेवेसाठी ट्रेन मध्ये होती. संपूर्ण सुविधांनीयुक्त अशा या यात्रेत दर्शन घेऊन भाविकांची काशी विश्वनाथ यात्रा संपन्न झाली.
सचिन प्रभाकर सानप यांची ही पहिलीच काशी यात्रा होती. या पुढेही दरवर्षी तीर्थक्षेत्र दर्शन यात्रेचे आयोजन केले जाणार असून दरवर्षी हजारो नागरिकांना देव दर्शनासाठी नेण्याचे उद्दिष्ट सचिन प्रभाकर सानप यांच्याकडून ठेवण्यात आले आहे.
दरम्यान श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी (काशी पीठ) यांचे आशीर्वाचन व दर्शन आयोजकांसह सर्व यात्रेकरूंना मिळाला. हिंदू संस्कृतीमध्ये माता पित्याना तीर्थयात्रा घडवून आणण्याची पद्धत आहे, परंतु सचिन सानप यांनी सातशे माता-पितांचं तीर्थयात्रा घडून आणले. सचिनने केलेल्या पुण्य कर्माचे फल श्री काशी विश्वनाथ नक्कीच देतील. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, असे मंगलमय आशीर्वाद महास्वामीजींनी दिले.
नागरिकांशी झालेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे समस्त नागरिक यात्रेसाठी येण्यासाठी इच्छुक असतात. हाच विश्वास आणि जिव्हाळा यापुढेही असाच राहील असा विश्वास व्यक्त करतानाच यात्रा सुरक्षित व केलेल्या नियोजनानुसार भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली असून यात्रेतील भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला समाधान मिळाल्याचे सचिन प्रभाकर सानप व त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. तीर्थयात्रा सफल होण्यासाठी सनसागर मित्र मंडळ, सचिनदादा प्रभाकर सानप युवा प्रतिष्ठान, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान व युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.