मावळ (Pclive7.com):- मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या समाधीस्थळ विकास आराखड्यासाठी सुमारे ६६ कोटी ११ लक्ष रु.च्या निधीस राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231105-WA0005-300x150.jpg)
देहू व भंडारा डोंगरानजीक असलेल्या सुदुंबरे येथील समाधी स्थळी वर्षभर लाखो भाविक व वारकरी दर्शनासाठी येत असतात.सोयी-सुविधांचा अभाव असल्याने भाविकांची गैरसोय होत होती. संत तुकाराम महाराजांची गाथा कर्मठांनी पाण्यात बुडविल्यानंतर संत जगनाडे महाराजांनी गाथेचे संकलन व पुनर्लेखन केले होते. तसेच त्यांनी स्वतः अनेक अभंग लिहून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले आहे. यामुळे संत जगनाडे महाराजांच्या समाधी स्थळास विशेष महत्त्व आहे.
श्री क्षेत्र देहू,आळंदी, भंडारा डोंगर विकास आराखड्यांतर्गत सुदूंबरे ता.मावळ येथील जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाचा विकास व परिसर सौंदर्यीकरण करणे या विकास आराखड्यास २३ नोव्हेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत ६६ कोटी ११ लक्ष रु.च्या प्रस्तावित विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. या विकास आराखड्यांमध्ये भव्य सभा मंडप बांधणे, प्रशासकीय इमारत बांधणे,एकवीस फुटी कांस्य पुतळा आणि दगडी आच्छादन असलेले संग्रहालय, सुसज्ज भक्तनिवास, महाद्वार, घाट बांधकाम, अंतर्गत रस्ते, गार्डन इ.आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. सदर कामे करताना ऐतिहासिक वास्तूंची मूळ शैली देखील जपण्यात येणार आहे.
“संत जगनाडे महाराज समाधी स्थळ विकास आराखड्यासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानतो. महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास हा आराखड्यानुसार भव्य व सुंदर होईल. भावी पिढीपर्यंत संतांचा महिमा आणि सांप्रदायिक वारसा पोहचविण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येईल.”– आमदार सुनिल शेळके.