पिंपरी (Pclive7.com):- अन्नधान्याचे उत्पन्न मोठ्याप्रमाणावर होऊन सुद्धा योग्य प्रणालीचा अभाव असल्याने तसेच सरकारकडून त्याची खरेदी योग्य भावात होत नसल्याने दिवसेंदिवस अन्नधान्याचे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल शासनाने योग्य हमीभावाने खरेदी करून देशातील इतर भागांमध्ये उपलब्ध करून द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना याचा लाभ होईल व अन्नधान्याचे उत्पन्न वाढेल अशा आशयाचे व भारतामध्ये क्रिकेट, टेनिस व बँडमिंटन यांसारख्या खेळांना व खेळाडूंना सुप्रसिद्ध व त्याचबरोबर चांगल्या सुविधा ही मिळतात परंतु देशामधी ऑलम्पिक खेळाडूंना मात्र कोणत्याही प्रकारच्या चांगली सुविधा मिळत नसल्याने ऑलम्पिक खेळाला तरुणांची पसंती कमी आहे. देशातील ऑलम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे तसेच नवनवीन खेळाडू तयार व्हावेत यासाठी त्यांना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून देशाला उत्कृष्ट दर्जाचे ऑलम्पिक खेळाडू मिळतील अशा आशयाची दोन खाजगी विधेयक खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सादर केले.
देशातील शेतकऱ्यांना शेतीसंबंधी माहिती देण्यासाठी सरकार आणि कृषी विभागामार्फत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील काही भागातील शेतकरी विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करीत आहेत. परंतु दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाची नासाडी होते व हा शेतीमाल ज्यावेळी बाजारामध्ये विक्रीसाठी जातो तेव्हा त्याचा योग्य मोबदला मिळत नाही आणि शेतकऱ्यांची मिळकत दिवसेंदिवस कमी होत चालल्याने शेतकरी हताश होऊन आत्महत्या करीत आहे. यावर्षी चांगल्या प्रमाणात पेरणी होऊन तसेच शेतीसाठी अनुकूल वातावरण असूनसुद्धा भाजी व इतर धान्न्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपली उपजीविका भागविणे कठीण झाले आहे.
नागरिकांच्या हितासाठी विविध धोरणे उभी करून त्याची योग्य अंमलबजावणी करणे हे कल्याणकारी राज्यासाठी महत्वपूर्ण आहे परंतु शेतीशी संबंधित अशा धोरणांची योग्य अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे देशाला स्वतंत्र मिळून ७० वर्षे होऊन सुद्धा देशातील शेतकऱ्यांच्या परस्थिती मध्ये कोणतीही सुधारणा झालेली दिसत नाही. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या अहवालानुसार देशातील ८६ टक्के शेतकर्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे परिणामतः उत्पन्नही कमी होत असल्याने त्यांना आपली उपजीविका भागविणे कठीण होत आहे. तर दुसरीकडे मोठी शेती असलेले शेतकरी आयकरामध्ये करोडो रुपयांची सूट मिळवीत आहेत. ही तफावत कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या शेतीमालाला सरकाने योग्य हमीभावाने खरेदी करावीत.
तसेच देशातील बहुतांश नागरिक आपल्या मुलांना त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी मेडिकल किंवा इंजिनियरिंग सारख्या शाखांना पसंती देत आहेत. परंतु खेळामध्ये त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची प्रेरणा मिळत नाही. ऑलम्पिक मध्ये खेळण्यासाठी बहुतांशी खेळाडू हे ग्रामीण भागातच तयार होत असतात परंतु त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. देशाचे नाव जागतिक स्थरावर उंचाविण्यासाठी ऑलम्पिक खेळाडू चिकाटीने परिश्रम घेत असतात परंतु त्यांना सरकारकडून चांगल्या सुविधा व प्रोत्साहन मिळत नसल्याने हळू हळू त्यांचा या खेळाकडे वळण्याचा कल कमी होत चालला आहे. क्रिकेटसारख्या इतर खेळामधील खेळाडूना सरकार कडून शासकीय व निमशासकीय नोकरी लवकर मिळू शकते पण दुसरीकडे जो ऑलम्पिक खेळाडू आहे त्या खेळाडूला सरकारकडून तुटपुंजी मदत मिळते. त्यामुळे सरकारने ऑलम्पिक सारख्या खेळासाठी बजेटमध्ये जास्तीत जास्त तरतूद करून ऑलम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी खाजगी विधेयकाद्वारे लोकसभेत केली असे बारणे यांनी दिलेल्या प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.