पिंपरी (Pclive7.com):- निगडी ते रावेत उड्डाणपुल तत्काळ वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे. येत्या पाच दिवसात हा पुल सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला न केल्यास मनसेच्या वतीने या रस्त्याचे उद्घाटन करण्यात येईल असा इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे.
सचिन चिखले यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, निगडी ते रावेत उड्डाणपुल या बीआरटीएस मार्गाचे काम तब्बल आठ वर्षानंतर पूर्ण झाले आहे. नेतेमंडळीची वेळ मिळत नसल्याने तो रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आलेला नाही. सदर मार्ग गेली आठ वर्ष रखडला होता. जागा ताब्यात न घेता महापालिकेने थेट बीआरटी मार्गाचे काम सुरू केले. संबंधित शेतकरी न्यायालयात गेल्याने तसेच, जागा हस्तांतरणात तब्बल 8 वर्षाचा कालावधी गेला. या 45 मीटर रूंद मार्गाचे काम जानेवारी महिन्यात पूर्ण झाले आहे. व या मार्गासाठी 87 कोटी रुपये खर्च झाले आहे. त्यामुळे निगडीच्या भक्ती-शक्ती चौकापासून रावेतच्या मुकाई चौकापर्यंत केवळ दहा मिनिटात पोहचता येणार आहे. या मार्गामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांची 26 जानेवारी 2024 ची तारीख अचानक रद्द झाल्याने पुलाचे उद्घाटन करण्यात आले नाही. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही तारीख मिळालेली नाही. नेतेमंडळींची प्रतीक्षा न करता आयुक्तांनी हा मार्ग त्वरित सर्वसामान्यनागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून वाहतुकीस खुला करावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात येईल असा इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे.