पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील निवडणूका कधी होतील हे सांगता येणार नाही. मात्र खासदरकीसाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी खासदार श्रीरंग बारणे व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हिरवा कंदील दिला आहे, असे शिवसेना नेते, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी सांगितले. तसेच त्यांनी खासदार बारणे यांना देशातील कोट्यवधी शिवसैनिक आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून वाढदिवसाच्या व पुढील खासदरकीसाठी शुभेच्छा दिल्या.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात शुक्रवारी खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेले माजी महापौर हनुमंत भोसले यांना जीवनगौरव पुरस्कार, मुरलीकांत पेटकर यांना जीवनगौरव पुरस्कार, शकुंतला माटे – जीवनगौरव पुरस्कार, डॉ. दिलीप कामत – वैद्यकीय भूषण, इकबाल खान – शिक्षण गौरव, अमित भिंगुर्डे – उद्योग रत्न, लक्ष्मण म्हेत्रे – उद्योग रत्न, एस. आर. शिंदे – मैत्री भूषण, सुरेंद्र शेळके – गिर्यारोहण गौरव, तेजश्री अडिंगे – कला भूषण, श्रीचंद्र आसवाणी – उद्योग भूषण, बब्रुवान नथुजी वाघ महाराज – अध्यात्मिक गौरव, बाळासाहेब मरळ – अध्यात्मिक गौरव, प्रदीप वाल्हेकर – स्वच्छता दूत हनुमंत माळी – गुणवंत कामगार पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच गोखले वृंदावन सोसायटी चिंचवड या सोसायटीला आदर्श सोसायटी पुरस्कार देण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे यांना संसदेतील उल्लेखनीय कार्याबद्दल सलग तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल बारणे यांचा विशेष सत्कार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गीते बोलत होते.
यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरसंघटिका सुलभा उबाळे, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, भगवान वाल्हेकर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, गजानन चिंचवडे, नारायण बहिरवडे, नगरेसवक राहुल भोसले, शशिकीरण गवळी, मधुकर बाबर, भगवान वाल्हेकर, सचिन चिखले, सचिन भोसले, मारुती भापकर, शिवसेना पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुशीला पवार, रवी नामदे, शिवसेना जिल्हाध्यक्ष राम गावडे, उमेश गोलांडे, धनाजी बारणे, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर आदी उपस्थित होते.
अनंत गीते म्हणाले, मी ६ वेळा संसदेत गेलो. सध्या शिवसेनेचे १८ खासदार संसदेत आहेत. त्यातील मंत्रिपद मिळालेला मी एक भाग्यवान आहे. पुढच्यावेळी हे भाग्य कुणाला लाभणार हे सांगता येणार नाही. पण बारणे आणि आढळराव पाटील एकमेकांना समजून घेतील असा विश्वास आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीला वर्षाच्या शेवटी आपण वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्याचा दंडक शिवसेना प्रमुखांनी घालून दिला होता, तो दंडक आजही सुरू आहे.
शिवसेना एक कुटुंब आहे. आपण त्या कुटुंबाचा एक घटक आहोत. एखादा कार्यकर्ता समाजासाठी झोकून देतो तेंव्हा समाजाने सुद्धा त्या कार्यकर्त्याला संधी द्यायला हवी, असेही ते म्हणाले.
खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा निवडून येणार असा विश्वास व्यक्त करत खासदार शिवाजीराव आढळराव म्हणाले की, बारणे म्हणजे कर्तव्यदक्ष खासदार अशी दिल्लीत ओळख निर्माण झाली आहे. लोकसभेत सर्वाधिक वेळा भाग घेणारे खासदार म्हणून बारणे ओळखले जातात. खासदार बारणे लोकांच्या गराड्यात राहणारा खासदार आहेत. आम्ही सतत विचारांचे आदान प्रदान करतो. लोकसभेत सर्वात अधिक चर्चेत भाग घेणारे खासदार शिवसेनेचेच आहेत. दिल्लीत गेल्यावर करायचं काय हा प्रश्न इतर खासदारांपुढे असतो तर शिवसेना खासदारांपुढे जनतेचे प्रश्न असतात.
निवडणुकीची भीती शिवसेनेला नाही. शिवसेनेला केवळ लढायचे आणि जिंकायचे एवढेच माहिती आहे. राजकारणात जागरूक आणि दक्ष राहणे गरजेचे आहे, असेही आढळराव म्हणाले.
चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे म्हणाले, कित्येक वर्षांपासून चापेकर बंधूंचे पोस्टाचे तिकीट काढण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. त्यामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांनी लक्ष घातले आणि काहीच दिवसात हा प्रश्न सुटला. काम हाती घेतल्यास ते तडीस न्यायचे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी आपल्या कामात प्रत्येक वेळी प्रामाणिकपणा दाखवला आहे. बारणे पुन्हा निवडून येणार यात काही शंकाच नाही, असेही ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संसदेत जाऊन जनसेवा करण्याची संधी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभारी आहे. आजवर मी काम करत असताना केवळ माणसे जोडत गेलो. माणसे तोडण्याच काम कधीच केल नाही. मला आव्हाने पेलायला आवडतात. सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी कार्यकर्त्यांना बळ देत जनसेवा केली, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संयोजन खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनचे रवी नामदे, गजानन चिंचवडे, बशीर सुतार, धनाजी बारणे, मारुती बहिरवाडे यांनी संयोजन केले.