पिंपरी (Pclive7.com):- देशात आज नागरिक सुरक्षित नाही. बहुजन समाजावर अन्याय वाढलायं. दलित समाजाला सरकारी नोकरीतील पदौन्नती रोखली. भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. अँट्रोसिटी कायदा पांगळा केलायं. शहरात भाजपाची सत्ता येऊन वर्ष झाले, मात्र कचरा, पाणी यासारखे अनेक प्रश्न तडीस गेले नाहीत. नगरसेवक होऊन मी समाधानी नाही. मी त्या पापांचा धनी का व्हायचे असे सांगत भाजपपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ओव्हाळ म्हणाले की, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करत त्यातील दोन मुद्दे शिथिल करून हा कायदा पांगळा करण्यात आला आहे. देशातील उत्तर प्रदेश व इतर राज्यात दलित व बहुजन समाजातील नागरिकांवर होणारा अन्याय वाढला आहे. भीमा-कोरेगाव दंगलीच्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील दलित समाजाच्या लोकांच्या पदोन्नत्या शासनाने रोखल्या आहेत. लोकांमध्ये असंतोष असून तो दिसून येतो. लोकांच्या भावनेचा आदर ठेवून हा निर्णय घेतलेला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. शहरातील महत्त्वाचा कच-याचा प्रश्न भाजपला सोडविता आलेला नाही. अधिका-यांना वारंवार सूचना देऊन सांगून देखील कच-याच्या समस्येकडे लक्ष दिले जात नाही. या मुद्द्यामुळे मी भाजपपासून या पुढील राजकीय कारकीर्दीत अलिप्त राहणार आहे. भाजपची विचारसरणी व धोरणाच्या आपण विरोधात आहोत. पक्षातील कोणत्याही व्यक्ती किंवा नेत्याच्या विरोधात नाही. माझ्या निर्णयावर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करावी. होणारे परिणाम भोगण्यासाठी तयार आहे.
पुढे ते म्हणाले की, माझा नेते मंडळींवर रोष नाही. परंतू पक्षाची जे उदिष्ट्ये आहेत त्याच्यावर आक्षेप आहे. आज त्यांचा ध्येय कोणत्या दिशेने चाललीत हे जनतेला माहिती आहे, जनता सुज्ञ आहे. आज देशामध्ये एकात्मतेला धोका पोहचतो असं वाटतयं. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय. जर मी त्या पक्षाबरोबर रहायचं तर मी त्या पापांचा धनी का व्हायचं असा सवाल उपस्थित करत ओव्हाळ यांनी भाजपापासून अलिप्त होण्याचा निर्णय घेतला.