पिंपरी (Pclive7.com):- कर्नाटक विधानसभेत शनिवारी घडलेल्या राजीनाम्या नाट्यामुळे देशाची राज्यघटनाच अंतिम असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सिध्द झाले. भाजपाच्या हुकूमशाही वाटचालीला कर्नाटकामधून ‘चपराक’ बसली असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.
कर्नाटक विधानसभेत शनिवारी दुपारी येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात लाडू वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, मागासवर्गीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष गौतम आरकडे, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ज्येष्ठ नागरिक सेल शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, शहर सरचिटणीस ॲड. क्षितीज गायकवाड, चिंचवड युवा अध्यक्ष मयुर जैयस्वाल, नंदा तुळसे, हुरबानो शेख, हिरामण खवळे, हिरा जाधव, मकरध्वज यादव, अनिरुध्द कांबळे, उमेश खंदारे, विजय ओव्हाळ, बाबासाहेब बनसोडे, विश्वनाथ खंदारे, तुषार पाटील, नासिर चौधरी, ईशादअली खान, गौरव चौधरी, श्रीरंग सरपते, आनंदराव फडतरे, अशोक शेडगे, नितीन खोजेकर आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, स्वतंत्र भारतात राज्यघटनेचे महत्व वारंवार सिध्द झाले असतानाही राज्यघटनेचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. राज्यपालांच्या अधिकारांचा सोयिस्करपणे वापर करुन एक-एक राज्य हुकूमशाही पध्दतीने काबिज करण्याचे मोदी व शहांचे मनसुबे यामुळे धुळीस मिळाले आहेत. कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपाचा देशभरातून परतीचा प्रवास सुरु होणार आहे. काँग्रेस मुक्त भारताची भाषा करणारेच काँग्रेसच्या आमदारांना लक्ष्मी दर्शन देऊन पक्षांतर करण्यासाठी लाचारपणे प्रयत्न करीत असल्याचे चित्र देशातील जनतेने पाहिले. यांच्या हुकूमशाहीला रोखण्यासाठी येथून पुढे होणा-या सर्व निवडणूका मतपत्रिकेव्दारेच झाल्या पाहिजेत. यासाठी ईव्हीएम विरोधात देशव्यापी जनआंदोलन झाले पाहिजे. विकसित देशांनी देखील ईव्हीएम बंद करुन मतदान सुरु केले आहे. देशातून भाजप वगळता सर्वपक्ष आणि मतदारांचा ईव्हीएमला विरोध असताना, ईव्हीएमव्दारेच मतपत्रिकेव्दारे मतदान घेण्याचा भाजपचा हट्ट संशयास्पद आहे. सव्वाशे कोटी जनतेचे नेतृत्व करतो म्हणून जगभर मिरवता तर, मतपत्रिकेव्दारे मतदान घेण्याच्या जनतेच्या मागणीचा आदर का राखला जात नाही. पारदर्शकपणे निवडणूका होण्यासाठी ईव्हीएम हटविलेच पाहिजे अशी मागणी साठे यांनी यावेळी केली.