पिंपरी (Pclive7.com):- आषाढी वारीतील दिंडी प्रमुखांना देण्यात येणा-या विठ्ठल – रूक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा झाल्याचा आव आणणा-या भाजपने राष्ट्रवादीला बदनाम केले परंतू त्या आरोपात काहीच तथ्य आढळले नाही, त्याउलट भाजपने मात्र गत वर्षी वारक-यांना वाटप केलेल्या ताडपत्री खरेदीत घोटाळा झाल्याचे उघड झाले. भयमुक्त भ्रष्टाचार मुक्तीच्या वल्गना करीत सत्तेत आलेल्या भाजपचा मात्र ‘भ्रष्टाचार’ हाच अजेंडा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या वर्षी वारक-यांना कोणतीही भेटवस्तू न देणे म्हणजेच भाजपला पुन्हा एकदा भ्रष्टाचार होण्याची पक्की खात्री असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात बच्छाव यांनी म्हटले आहे की, आषाढी वारीतील दिंडी प्रमुखांना देण्यात येणा-या विठ्ठल – रूक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा झाला नसल्याचा निष्कर्ष महापालिका आयुक्तांनी काढला होता. त्यामुळे या प्रकरणात भाजप तोंडावर आपटून त्यांचा खोटारडेपणा सिद्ध झाला. भाजपने जनतेला धार्मिकतेबाबत संवेदनशील करुन खोटे बोलून राष्ट्रवादीची बदनामी केली हे स्पष्ट झाले. याउलट गेल्या वर्षी महापालिकेत भाजपची सत्ता येताच, पालखीतील दिंडी प्रमुखांना देण्यात येणा-या ताडपत्री खरेदीची जादा दराने निवीदा मंजूर करून सत्ताधा-यांनी भ्रष्टाचार केला. सल्लागार तसेच विविध निरर्थक बाबींवर लाखो रुपयांची उधळपट्टी करणा-या भाजपला वर्षानुवर्षांपासून चालत आलेली वारक-यांना भेटवस्तू देण्याची परंपरा खंडीत करून काय निष्पन्न करायचे आहे? असे बच्छाव यांनी म्हटले आहे.
सल्लागारांवर उधळपट्टी करणा-या भाजपला वारक-यांना देण्यात येणा-या भेटवस्तूंचे वावडे का? – अमित बच्छाव
![सल्लागारांवर उधळपट्टी करणा-या भाजपला वारक-यांना देण्यात येणा-या भेटवस्तूंचे वावडे का? - अमित बच्छाव](https://pclive7.com/wp-content/uploads/2018/06/IMG-20171128-WA0022.jpg)