देहू (Pclive7.com):- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात काही मराठा बांधवाना सहभागी होता आले नाही. मुंबई मध्ये गेलेल्या मराठा आंदोलकांची जेवण, पाण्याची आबाळ होऊ नये यासाठी एक कृतज्ञता म्हणून समस्त देहूगाव व पंचक्रोशीतील समस्त मराठा समाजाने एकत्र येऊन पाच टेम्पो भरून रसद मुंबईकडे रविवारी (दि.३१) पाठवले.

आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांसाठी भाजी भाकरी संकलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही भाजी, भाकरी, चटणी, पाण्याच्या बाटल्या देहूगाव येथील हनुमान मंदिरात रविवारी सकाळ पर्यंत जमा करण्यात आल्या. त्याप्रमाणे देहूतील समस्त मराठा महिला भगिनींनी भाकरी, भाजी, चटणी, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे, राजगिरा लाडू असे अन्न जमा केले.

जमा झालेल्या भाकरीचे पाच टेम्पो भरून रविवारी सकाळी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले. राज्य सरकारकडून मराठा आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा संशय आंदोलकांना आहे. त्यामुळे तिथे आंदोलनाला बळ मिळावे, यासाठी राज्यभरातून अशा प्रकारे मदत पुरवली जात आहे. या भाकरी, चटणी संकलनास देहूगाव व पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.























Join Our Whatsapp Group