पिंपरी (Pclive7.com):- “पिंपरी चिंचवड शहराला दररोज पाणीपुरवठा होणे हा नागरिकांचा हक्क आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. हा प्रश्न संपूर्ण शहराचा असल्याने सत्तेत आणि विरोधात असलेल्या प्रत्येकाने राजकारण बाजूला ठेवून, शहराला दररोज आणि नियमित पाणीपुरवठा करण्याचे एकच लक्ष्य ठेवले पाहिजे.” अशी ठाम भूमिका भाजपा नगरसेवक राहुल कलाटे यांनी मांडली.

महानगरपालिकेच्या पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शहराच्या पाणी तसेच भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर जोरदार चर्चा झाली. यावेळी प्रभाग क्रमांक २५ (वाकड-ताथवडे-पुनावळे) च्या वतीने प्रतिनिधित्व करताना, कलाटे यांनी भूमिका स्पष्ट केली.
राहुल कलाटे यांनी पिंपरी-चिंचवड शहराला दररोज पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सभागृहात अत्यंत खंबीर आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली. उपस्थित सर्वच नगरसेवकांनी आपापल्या भागातील पाण्याचा प्रश्न मांडला. मात्र, गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला संपूर्ण शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी एका व्यापक दृष्टिकोनाची गरज त्यांनी अधोरेखित केली.

शहराचा पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आज शहरातील प्रत्येक प्रभागाला पाण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाला हक्काचे पाणी मिळावे, यासाठी अगोदर शहराचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडविण्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. सर्वांनी पक्षांच्या पलीकडे जाऊन शहरात दररोज पाणी पुरवठ्यासाठी ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
त्यांच्या या स्पष्ट आणि सर्वसमावेशक भूमिकेमुळे, नागरिकांच्या प्रश्नांवर तडजोड न करणारे एक खंबीर नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे.



















Join Our Whatsapp Group