पिंपरी (Pclive7.com):- होळीच्या सणानिमित्त पिंपरी-चिंचवड परिसरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने विशेष वाहतूक नियोजन केले आहे. वल्लभनगर आगारातून दि. २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी एकूण चार जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली.

या चार जादा बसेसपैकी एक बस चिपळूण मार्गावर तर तीन बसेस खेड मार्गावर धावणार आहेत. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण, गुहागर आणि देवगड या प्रमुख कोकण मार्गांवर प्रवाशांच्या मागणीनुसार अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकावर अतिरिक्त कर्मचारीही तैनात करण्यात येणार आहेत.

दरम्यान, यंदा प्रवाशांनी काउंटरवरील तिकिटांपेक्षा ऑनलाइन आरक्षणाला अधिक पसंती दिली आहे. अनेक बसेसचे आरक्षण आधीच पूर्ण झाले असून, उर्वरित जागांसाठी लवकर आरक्षण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. होळीच्या सुट्ट्यांमध्ये सुरक्षित आणि सुरळीत प्रवास व्हावा यासाठी आगार व्यवस्थापनाकडून विशेष दक्षता घेतली जात असून, प्रवाशांनी नियोजित वेळेआधी बसस्थानकावर उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.


















Join Our Whatsapp Group