स्मशानभुमीच्या विविध समस्या सोडविण्याची सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- मोरवाडी येथील ‘आनंदधाम’ स्मशानभुमीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून विविध अडचणींमुळे तेथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्मशानभुमीच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दर महिन्याला सरासरी ४० ते ५० च्या आसपास या स्मशानभुमीमध्ये अंत्यविधीसाठी केले जातात.तेथे उद्भवणाऱ्या विविध समस्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. दररोज किमान २ ते ३ शवांचा अंत्यविधी स्मशानभूमित करण्यात येतो. त्या स्मशानभुमीचे पत्र्याचे शेड पूर्णपणे तुटले असून ते बदलणे गरजेचे आहे. अंत्यविधी वेळी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात धुर होतो. धुरामुळे तेथे येणाऱ्या नागरीकांना, रहिवास्यांना, लहान मुलांना त्याचा त्रास होत असून त्यांना आजारांना सामोरे जावे लागत अाहे. त्यामुळे आयुक्तांनी या स्मशानभूमिची पाहणी करण्यात यावी, व स्मशानभूमिमध्ये नविन धुराडे (चिमण्या) बसविण्यात याव्यात. स्मशानभुमीच्या येथे असणाऱ्या शौचालयाचे ड्रेनज वारंवार जाम होऊन मैला बाहेर येत असतो, त्यामुळे दहन करण्याच्या शेडसमोर दुर्गंधी पसरून अंत्यविधी करताना अडचणी येतात. शौचालयामध्ये विद्युत दिवे बसविण्यात यावेत. स्मशानभूमिमध्ये पाण्यासाठी असणारी टाकी अत्यंत लहान स्वरूपाची आहे त्यामुळे पाणी पुरत नाही, म्हणून त्या ठिकाणी जास्त क्षमतेची पाण्याची टाकी बसविण्यात यावी. तसेच नळांची संख्या वाढविण्यात यावी. स्मशानभूमिमध्ये असणा-या दफनभुमीत गवत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे तेथे सापांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून स्मशानभूमित कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. येथील गवताची छाटणी करण्यात यावी. स्मशानभुमिचे क्षेत्र पाहता तेथे असणाऱ्या विद्युत खांबांची संख्या वाढविण्यात यावी.रात्रीच्या वेळेस स्मशानभुमिच्या संरक्षक भिंतीवरून निर्धास्त पणाने उड्या मारून येथे काही जण सर्रासपणे येतात. या अनुषंगाने संरक्षक भिंतींवर जाळ्या बसविण्यात याव्यात.स्मशानभूमिमध्ये परंपरागत लाकडावर चिता ठेऊन एका मोठ्या चौकोणी खड्ड्यामध्ये अंत्यविधी करण्यात येतो. त्यामुळे ते खड्डे बुजविण्यात यावेत आणि त्या जागी अत्यंविधीसाठीच्या लोखंडी साचे बसविण्यात यावेत. सदर स्मशानभुमिमध्ये सुरक्षारक्षकासाठी असणारी खोली अत्यंत धोकादायक स्थितीत असून ती खोली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ते बांधकाम हटविण्यात यावे,व सुरक्षारक्षकासाठी त्या ठिकाणी एक कँबिनची व्यवस्था करण्यात यावी. स्मशानभुमीच्या प्रवेशद्वारावर स्मशानभुमिची विविध नियमावलींचा मोठा बोर्ड लावण्यात यावा, व प्रवेशद्वारावर असणारे स्मशानभुमीचेे नाव हे पुसट झाले आहे. त्यामुळे ते नाव पुन्हा टाकण्यात यावे. स्मशानभुमीमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे स्मशानभुमीची वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी. तसेच काही विद्युत दिवे हे तेथे असणा-या झाडांच्या फांद्यांमुळे झाकले गेले आहेत. त्यामुळे तेथे पुरेसा प्रकाश पडत नाही, सदर झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात यावी. अशा असंख्य मागण्या खैरनार यांनी केल्या आहेत.