पिंपरी (Pclive7.com):- यंदाच्या वर्षी पुरेसा पाऊस झाल्यामुळे पवना धरण वेळेतच १०० टक्के भरले होते. परंतू गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने धरणात अवघा ८० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. म्हणून पाणी कपातीसंदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी उद्या मंगळवार दि.२७ रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेचे प्रमुख पदाधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांची सेक्टर २३, जलशुध्दीकरण केंद्र निगडी येथे तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे यंदा हिवाळ्यापासूनच पाणी कपातीचे संकट शहरवासियांवर ओढावले आहे.
पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण यंदा १०० टक्के भरले होते. परंतू गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपलेली पहायला मिळाली. दरम्यान स्वत: आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दखल घेत शहरात एकप्रकारची पाणीबाणी जाहिर केली. पाणी गळतीमुळेच ही टंचाई होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान शहरात होत असलेला पाण्याचा अपव्यय आणि पाणीचोरी रोखण्याचे सक्त आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.
दरम्यान आज पवना धरणात ८० टक्के पाणीसाठा उरला आहे. भविष्यातील पाणी संकट आणखी गडद होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने प्रमुख पदाधिकारी तसेच गटनेत्यांची बैठक बोलविली आहे. उद्या मंगळवार दि.२७ रोजी निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष अाघाडीचे गटनेते कैलास बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले आहे.