पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने पूर्ण क्षमतेने पाणीसाठा गाठल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते जलपूजन करून जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी शहराला वर्षभर पुरेसा, नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली.

पवना धरण हे पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे जलस्रोत आहे. यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जलपूजनाच्या माध्यमातून जलस्रोतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच पाण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला.
जलपूजनाच्या निमित्ताने जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर, नदीपात्राची स्वच्छता आणि जलपरिसराचे संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची गरज असल्याने उपलब्ध जलसाठ्याचे जतन करणे आणि त्याचा योग्य वापर करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
जलपूजनाचा कार्यक्रम पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यात आला. धरण परिसर तसेच नदीपात्र स्वच्छ ठेवणे, जलप्रदूषण टाळणे आणि जलस्रोतांच्या स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. पवना नदी व धरण परिसराची स्वच्छता आणि जलस्रोतांचे संरक्षण यासाठी नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेता भविष्यातील पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी जलस्रोतांचे नियोजनबद्ध संवर्धन, पाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर यावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांनीही पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरीदे, जलसंपदा विभागाचे रजनीश भारिया यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील पत्रकार बंधू-भगिनी, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जलपूजनाच्या माध्यमातून पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच ‘पाणी वाचवा, जलस्रोत जपा आणि भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षित शहर घडवा’ हा संदेश देण्यात आला.





















Join Our Whatsapp Group