पिंपरी (Pclive7.com):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व शास्तीकर माफीबाबत दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी शहरातील सर्व विरोधी राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. या सर्व पक्षांच्या वतीने आज (दि. ३१) महापालिका मुख्यालयासमोर दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत घंटानाद आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती सर्व विरोधकांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, स्वराज अभियानचे मानव कांबळे, भारिप बहुजन महासंघाचे गुलाब पानपाटील, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, शेकापचे हरिष मोरे, मारुती भापकर, शिवशाही व्यापारी सेनेचे युवराज दाखले, गणेश आहेर, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, सुभाष साळुंके, प्रल्हाद कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याबाबत विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तीचा प्रश्न प्रलंबित आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर गेली साडे चार वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात चार वेळा आले आहेत. मात्र, प्रत्येकवेळी त्यांनी हे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. 9 जानेवारीला चिंचवडमधील जाहीर कार्यक्रमात त्यांनी हा प्रश्न पंधरा दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही मुदत 24 तारखेला संपली आहे. या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी हे आंदोलन करत आहे.
मानव कांबळे यांनी या दोन्ही प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधत, केवळ आश्वासनांशिवाय पिंपरी-चिंचवडकरांना काहीही मिळाले नाही. राज्य सरकारमधील सत्ता बदल होऊनही शहरवासियांच्या पदरी मात्र निराश पडली आहे. तर शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी या आश्वासनांना गाजर संबोधत राज्य सरकारवर टीका केली.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी रडीचा डाव खेळत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आदेश देऊन महापालिका मुख्यालयासमोरील ‘काऊंट-डाऊन’चा फलक 21 जानेवारीलाच काढून टाकला. त्याचा निषेध आम्ही 22 जानेवारीला आंदोलन करुन केले. मुख्यमंत्र्यानी दिलेल्या त्या 15 दिवसाच्या मुदत 24 जानेवारीला संपलेली असून, सत्ताधाऱ्यांना कुंभकर्ण अवस्थेतून जागे करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिक शंखनाद, घंटानाद आंदोलन करणार आहेत, अशी माहिती मारुती भापकर यांनी दिली.