पिंपरी (Pclive7.com):- पवना धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक सध्या पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. तर शहरात अनेक ठिकाणी जुने पाण्याचे हापसे आणि विहिरी अत्यंत वाईट अवस्थेत पडून आहेत. त्यातील पाण्याचा काहीच वापर होत नाही. हे हापसे आणि विहिरी पुनर्जिवित करून त्यांची साफसफाई करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे शहरात भेडसावत असलेली पाणीटंचाई नक्कीच थोड्याफार प्रमाणात कमी होईल. त्यासाठी महापालिकेने शहरातील पाण्याचे स्त्रोत हापसे व विहिरी यांची साफसफाई करावी अशी मागणी शिवसेना नगरसेविका मिनल यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
मिनल यादव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. सध्या पवना धरण हे एकमेव पाण्याचे स्त्रोत शहराकरिता आहे. मात्र यंदाच्या वर्षी धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. पुढील काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे. त्यामुळेच महापालिकेने शहराला आजपासून एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला. पाण्याची समस्या एवढी गंभीर झाली असताना दुसरीकडे शहरातील पाण्याचे अनेक स्त्रोत दुर्लक्षित अवस्थेत वापराविना पडून आहेत. यात बोरवेल म्हणजेच हापसे आणि विहिरींची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने हे पाण्याचे स्त्रोत तातडीने स्वच्छ करून घेतले पाहिजे. शहरात जेवढे हापसे आणि विहिरी असतील त्यांची स्वच्छता केली पाहिजे. त्यामुळे नागरिकांना वापराकरिता पाणी उपलब्ध होऊन जाईल अशी मागणी मिनल यादव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.