पिंपरी (Pclive7.com):- इतकी वर्षे सत्तेत रहायची सवय असल्यामुळे विरोधक सध्या नैराश्यात आहेत. त्यात अजितदादा पवार यांना थोडं जास्तच नैराश्य आहे. म्हणूनच त्यांच्याकडून भाजपावर बिनबुडाचे आरोप, टीका केली जात आहेत. आदर्श विरोधकाची भूमिका त्यांना पार पाडता येत नाही. अजितदादांनी स्वत:च्या मुलाचे सोडून कधीच कुणीचंच कौतुक केलेलं नाही, अशी टीका पुण्याचे खासदार गिरीष बापट यांनी पत्रकार परिषदेत केली. दोनच दिवसापूर्वी अजित पवार यांनी महापालिकेतील कारभाराबाबत शहरातील आमदारांवर जाहिर मेळाव्यात टिका केली होती. त्याला खासदार बापट यांनी आज प्रत्युत्तर दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीत भारतीय जनता पार्टीची कोअर कमिटी आणि नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, स्थायी सभापती विलास मडेगिरी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी गिरीश बापट म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपाची तयारी पूर्ण तयारी झाली आहे. संघटनात्मक बांधणीवर आम्ही अधिक भर दिलायं. सत्तेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत. विकासाची दिशा आमच्याकडे आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शहरातील तीनही जागेवर पुन्हा महायुतीचे उमेदवार विजयी होतील यात कुठलीच शंका नाही. परंतू आता विरोधक नैराश्यात असल्याचे दिसून येत आहे. इतकी वर्षे सत्तेत रहायची सवय असल्यामुळे ही अवस्था आहे. त्यातच अजितदादा पवार यांना थोडं जास्त नैराश्य आल्याचे दिसून येतयं. त्यामुळेच कसलेही आरोप भाजपावर केले जात आहेत. आदर्श विरोधकांची भूमिका त्यांना बजावता येत नाही. त्यांनी आम्हाला आमच्या चुका जरूर सांगाव्यात, त्याचे स्वागत करू. परंतू त्यांना १५ ते २० वर्षात सत्तेत असताना जे जमले नाही ते आम्ही अवघ्या १५ ते २० महिन्यात करून दाखविलं. अजितदादा मुलाचं सोडून कुणाचंच ‘कौतुक’ कधी करत नाही. सत्तेपासून दूर गेल्याच्या नैराश्यातून त्यांच्याकडून भाजपावर सध्या आरोप सुरू असल्याचे ते म्हणाले.