पिंपरी (Pclive7.com):- डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आदींची कमतरता, तातडीक सेवा विभागात रूग्णांना तातडीने उपचार देण्याबाबत होणारे दुर्लक्ष, औषधांचा अपुरा साठा, तज्ज्ञ डॉक्टरांचा असलेला अभाव अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात महापालिकेचे संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय (वायसीएम) सापडले आहे. ‘सरकारी काम आणि थोडेसे थांब’ अशीच अवस्था येथे पाहण्यास मिळत आहे. वैद्यकीय उपचारासाठी होणाऱ्या दिरंगाईमुळे येथे दररोज उपचारासाठी येणारे रूग्ण त्रस्त झाले आहेत.
वायसीएम रूग्णालय हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथे पिंपरी चिंचवड शहर आणि शहराबाहेरून देखील रूग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रूग्णालयावर रुग्ण सेवेचा अतिरिक्त ताण पडतोयं. तातडीक सेवा विभागामध्ये रूग्णांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. काही घटनांमध्ये रूग्णांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. मात्र, त्यामध्ये विलंब होत आहे. महात्मा फुले जीवनदायिनी योजनेत रूग्णाला डिजिटल एक्स-रे काढून दिला नसल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांकडून होत आहे. बऱ्याचदा रूग्णांना आवश्यक असलेली औषधे रूग्णालयात मिळत नाही. ही औषधे येथील औषधालयातून किंवा बाहेरील खासगी मेडिकलमधून विकत घ्यावी लागतात. डॉक्टर, वॉर्डबॉय आदींची कमतरता आहे. तातडीक सेवा विभागात मदतकक्ष नसल्याने रूग्णांना उपचारासाठी दाखल करताना योग्य माहिती मिळत नाही, अशा एकना अनेक तक्रारी रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहेत.
महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधणार
वायसीएम रूग्णालयात रुग्णांना जाणवणाऱ्या विविध समस्यांबाबत नगरसेवक प्रमोद कुटे यांनी शनिवारी (दि. 2) प्रत्यक्ष रूग्णालयाला भेट देऊन अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याशी चर्चा केली. कुटे म्हणाले, रुग्णालयात परिचारिकांची संख्या अपुरी आहे. नवीन रूग्ण उपचारासाठी दाखल करण्यासाठी एक ते दीड तास विलंब होतो. ‘सीएमओ’ डॉक्टरांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. रुग्णालयात बालकांसाठी नव्याने केलेला 30 खाटांचा अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) परिचारिकांच्या अपुऱ्या संख्येमुळे वापराशिवाय पडून आहे. पर्यायाने, नवजात बालकांना उपचार मिळण्यात अडचणी जाणवत आहेत. या सर्व समस्यांबाबत महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरे उपस्थित करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधणार आहे.