
पिंपरी (Pclive7.com):- भोसरी येथून एका छोट्या व्यवसायिकाच्या १७ वर्षीय मुलाचे अपहरण त्याच्याच मित्राने केले. त्याने गळा आवळून त्याचा खून केला आणि त्यानंतर त्याचा पालकांकडे ४० लाख रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार शनिवारी रात्री घडला असून रविवारी पहाटे उघडकीस आला आहे. मृतदेह पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात सापडला आहे. अब्दुलअहत तयर सिध्दीकी (१७ वर्षे ८ महिने , रा. सीतादेवी मंदिर शेजारी, बॉम्बे कॉलनी, दापोडी) याचा खून झाला आहे. तर उमर नाशिर शेख नावाच्या मित्राला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल याचे वडील व्यवसायिक असून त्यांचे त्या परिसरात छोटे व्यवसाय आहेत. मुलगा अब्दुल हा बारावी मध्ये शिक्षण घेत होता तसेच भाजी पाल्याचा व्यवसायही संभाळत होता. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अब्दुल आणि उमर हे दापोडी येथून पार्टीसाठी बाहेर गेले होते. त्यानंतर दोघे पुणे परिसरात फिरवले. रात्री साडे नऊ, दहाच्या सुमारास उमर याने दोरीच्या सहाय्याने अब्दूलचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी अब्दुल याच्या फोन वरुन त्याच्या भावाच्या मित्राला फोन केला. अब्दुल हा आमच्या ताब्यात असून त्याला सोडविण्यासाठी ४० लाख रुपयांची मागणी केली. घडलेला प्रकार भावाला समजल्यानंतर त्याने भोसरी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी तपास सुरु केला. रविवारी पहाटे अब्दुल याचा मृतदेह पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात आढळून आला. पोलिसांनी अब्दुल याचा मित्र उमर याला ताब्यात घेतले आहे. मात्र नक्की खून कोणत्या कारणासाठी केला, खंडणी केव्हा मागितली, यामध्ये किती आरोपी आहेत याचा शोध पोलिस घेत आहेत.





















Join Our Whatsapp Group