पिंपरी (Pclive7.com):- कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक नागरिकांचा विविध कारणाने मृत्यू होत आहे. मात्र, अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर संबंधित मृत व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समजते. त्यामुळे अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित नागरिक आणि नातेवाईकांना कोरोना संसर्गाचा धोका संभवतो. त्यामुळे कोरोना चाचणीनंतरच मृतदेह ताब्यात देण्याची मागणी शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी केली आहे.
याबात यादव यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना निवेदन दिले आहे. कोरोना काळात बऱ्याच लोकांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचे चाचणीचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे लक्षात येत आहेत. त्यामुळे संबंधित मृत व्यक्तीच्या अंत्यविधीला उपस्थित नातेवाईक आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होते. तसेच या सर्व नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती यादव यांनी निवेदनात व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मृत व्यक्तींची कोरोना चाचणी लवकरात लवकर करून ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असल्याचे निदान झाल्यानंतरच संबंधित व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्यावेत. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह थेट स्मशानभूमित नेऊन त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असे यादव यांनी निवेदनात नमूद केले आहे.























Join Our Whatsapp Group