नवी दिल्ली (Pclive7.com):- देशातील प्रमुख वाहन कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने ग्राहकांना झटका दिला आहे. कंपनीने आपल्या प्रवासी वाहनांच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती गेल्या महिन्यातच वाढवल्या होत्या, आणि आता पॅसेंजर वाहनांच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे आता टाटाची कार खरेदी करण्यासाठी तुमच्या खिशाला जास्त झळ बसणार आहे.
टाटा मोटर्सने शुक्रवारी वाहनांच्या किंमती वाढवल्याची घोषणा केली, त्यानंतर लगेचच नवीन किंमती लागूही झाल्या आहेत. महाग झालेला कच्चा माल आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे किंमती वाढवत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
विविध मॉडेल्सच्या किंमती शून्य ते 26,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचं कंपनीने जाहीर केलंय. मात्र नेमकी किती वाढ कोणत्या कारच्या किंमतीत करण्यात आली याबाबत अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, २१ जानेवारीपर्यंत ज्या ग्राहकांनी कार बूक केल्या असतील त्यांना वाढलेल्या किंमतीचा फटका बसणार नाही असंही कंपनीने स्पष्ट केलंय.
दरम्यान, टाटा मोटर्सच्या आधी मारुती सुझुकी आणि महिंद्रा & महिंद्रा यांसारख्या आघाडीच्या कार कंपन्यांनीही आपल्या वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत.






















Join Our Whatsapp Group