नवी दिल्ली (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. ख्रिसमस आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी देशाला ही भेट दिली आहे. मोदींनी केलेल्या घोषणांनुसार, आता देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोसही सुरु करण्यात येणार आहे.
पंतप्रधान देशाला संबोधित करताना म्हणाले, भारतात अनेक लोकांना ओमिक्रॉन व्हेरियंटने संसर्गबाधित झाले आहेत. पण लोकांनी घाबरुन जाऊ नये सावध आणि सतर्क रहावं. मास्क आणि वारंवार हात धुणं या गोष्टी लक्षात ठेवा. कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या लढाईचा आजवरचा अनुभव हेच सांगतो की, व्यक्तीगत स्तरावर सर्व गाईडलाईन्सचं पालन करावं. हेच कोरोनाविरोधात लढाईचं मोठं हत्यार आहे. तर दुसरं हत्यार आहे लसीकरण.
भारतानं या वर्षी १६ जानेवारीपासून आपल्या नागरिकांना लस देण्यास सुरु केलं होतं. देशातील सर्व नागरिकांचा हा सामुहिक प्रयत्न आणि इच्छाशक्ती आहे की, आज भारतानं १४१ कोटी कोरोना लसीचे डोस देण्याचं अभूतपूर्व आणि अवघड लक्ष्य पार केलं आहे. आज भारताच्या पौढ लोकसंख्येपैकी ६१ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. याचप्रकारे प्रौढ लोकसंख्येपैकी ९० टक्के लोकांना लसींचा एक डोस देण्यात आला आहे.