पिंपरी (प्रतिनिधी):- चिंचवड स्टेशन येथे महापालिकेतर्फे बसविण्यात आलेले आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांचे शिष्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे अर्ध पुतळे हे मुख्य रस्त्यांच्या अगदी जवळ आहेत. पुतळ्यांची उंची कमी आहे. त्यामुळे पुतळ्यांवर धूळ बसत आहे. त्यासाठी पुतळ्यांच्या पाठीमागे ‘पीडब्ल्यूडी’ विभागाच्या ताब्यात असलेली जागा पालिकेच्या ताब्यात घ्यावी. त्या जागेत पुतळ्यांची पुर्नस्थापना करावी, अशी मागणी भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी महापालिकेकडे केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात गोरखे यांनी म्हटले आहे की, महापुरुषांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा नागरिकांना मिळावी या उद्देशाने शहरातील मुख्य चौकांत त्यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. त्यांची निगा राखण्याची जबाबदारी महापालिकेवर असताना शहरातील अनेक पुतळे मात्र धुळीने माखलेले आहेत. तसेच त्यांच्या अवतीभवती झाडेझुडपेही वाढलेली आहेत.
चिंचवड स्टेशन येथील चौकात महापालिकेतर्फे बसविण्यात आलेले आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांचे शिष्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे अर्ध पुतळे हे मुख्य रस्त्यांच्या अगदी जवळ आहेत. पुतळ्यांची उंची कमी आहे. त्यामुळे पुतळ्यांवर धूळ, गाड्यांचा धूर, कचरा, पालापाचोळा बसत आहे. तसेच पुतळा परिसरात नेहमीच अस्वच्छता असते. रात्रीच्या वेळी या परिसरात मद्यपी बसलेले असतात. त्यांच्यामुळे महापुरुषांचे पावित्र्य धोक्यात येत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.
पुतळ्यांच्या पाठीमागे मोठी मोकळी जागा आहे. त्या जागेचा ताबा ‘पीडब्ल्यूडी’ विभागाकडे आहे. त्यांच्याकडून पालिकेने ती जागा ताब्यात घ्यावी. त्या जागेत पुतळ्यांची पुर्नस्थापना करावी. जागेची स्वच्छता करावी. सुशोभिकरण करावे, अशी मागणी नगरसेविका गोरखे यांनी निवेदनातून केली आहे. तसेच पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील अन्य महापुरुषांचे पुतळे व चौकांचा परिसर समस्यांच्या गर्तेत आहे. पुतळा परिसरातील सर्व समस्या सोडविण्यात याव्यात, अशीही मागणी त्यांनी केली आहे.