मुंबई (Pclive7.com):- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकललेली असतानाच आता शिवसेना आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्हं नेमकं कुणाचं यावर आजपासून (दि.१२) निवडणूक आयोगाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. राज्यातील सत्तेमध्ये झालेले अनपेक्षित बदल आणि त्या पार्श्वभूमीवर माजलेलं राजकीय वादंग या साऱ्याच्या बळावर आज दुपारी ३ वाजल्यापासून निवडणूक आयोगापुढे सदरील युक्तीवादास सुरुवात होणार आहे. ही सुनावणी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे सत्तासंघर्षाची सुनावणी होईल, तेव्हा आयोगाच्या निर्णयालाही ग्राह्य धरलं जाणार आहे.

शिंदे आणि ठाकरे गटाचा युक्तिवाद ..
केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आज एकनाथ शिंदे आणि ठाकरे गट युक्तीवाद मांडतील. धनुष्यबाणावर दावा करण्यासाठी कागदपत्रांच्या लढाईनंतर आता प्रत्यक्ष युक्तिवाद सुरू होणार आहे. साधारण मागील दोन महिने दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची पूर्तता निवडणूक आयोगापुढे करण्यात आली होती. सुनावणी हा त्याचाच पुढचा टप्पा असणार आहे.

चिन्ह गोठवल्यानंतर काय असेल आयोगाचा अंतिम निर्णय?
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून पुढील २ दिवसांमध्ये यासंदर्भातील निर्णय येण्याची शक्यता आहे. येत्या काळात मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा निकाल काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दोन्ही गटांनी धनुष्यबाण चिन्हावर दावा केल्यानंतर निवडणूक आयोगानं हे चिन्हं गोठवण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर ठाकरे गटानं शिवसेना उद्धव बाळासाहेब असं नाव देत आपल्या गटासाठी मशाल चिन्हाची निवड केलं. तर, एकनाथ शिंदे गटानं बाळासाहेबांची शिवसेना असं नाव घेत गटासाठी ढाल- तलवार या चिन्हाची निवड केली.






















Join Our Whatsapp Group