पिंपरी (Pclive7.com):- उत्तर प्रदेश प्रमाणे ‘लव्ह जिहाद’ कायदा महाराष्ट्रात लागू केला पाहिजे. नैसर्गिक चक्र बदलत आहे. १२-१३ वर्षांच्या मुली वयात येत आहेत. त्यांना बळजबरीने पळवून नेले जात आहे. अशा मुलींचे व त्यांच्या पालकांचेही समूपदेशन होणे गरजेचे आहे. श्रध्दा वालकरची झालेली हत्या ही अमानवी आहे. त्यामुळे ही बाब पुढे आली आहे. उत्तर प्रदेश प्रमाणे ‘लव्ह जिहाद’ कायदा राज्यात लागू केला पाहिजे, असे मत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पत्रकार परिषदेस माजी महापौर माई ढोरे, महिला शहराध्यक्षा उज्वला गावडे, सुजाता पालांडे, चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख शंकर जगताप आदी उपस्थित होते. भाजपा महिला मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळावा पिंपळे गुरव येथे आज संपन्न झाला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात चित्रा वाघ यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
चित्रा वाघ म्हणाल्या की, मंत्री संजय राठोड यांच्या विरुध्द माझी लढाई सुुरुच आहे. मी न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. या प्रकरणात मला कोणीही गप्प बसा असं म्हटलेलं नाही. आमच्याबाबत गैरसमज पसरविला जात आहे. जेव्हा रस्त्यावरची लढाई होती तेव्हा मी रस्त्यावर लढले. आता न्यायालयीन लढाई आहे. ज्यांना यात सामिल व्हायचे ते होवू शकतात. त्या याचिकेला आणखी बळकटी येईल.
राज्यापालांबाबत भाजपाची भूमिका नेते म्हणून उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. तीच पक्षाची व माझी भूमिका आहे. संजय राऊत वादग्रस्त बोलतात, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलले. त्यांना आम्ही सर्वज्ञानी म्हणतो. तर भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधानांबाबत विचारले असता, प्रसाद लाड आदिंची चूक झाली तर त्यांनी माफी मागितली आहे. भाजपा हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. नवीन मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.