पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील शेतक-यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यत आंदोलन सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने ‘हायजॅक’ केले, अशी चर्चा पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु झाली आहे. भाजपचे सहयोगी सदस्य आणि आमदार महेश लांडगे यांनी अत्यंत शिताफीने बैलगाडा मालकांची सहानुभूती मिळवली. त्यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा ‘फियास्को’ झाला आहे.
बैलगाडा शर्यतीसाठी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सुमारे २००८ पासून प्रयत्नशील आहेत. शेतक-यांच्या मागण्यांसाठी खासदार आढळराव पाटील यांनी अनेकदा आंदोलन उभे केले. मात्र, २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात आणि राज्यात स्थापन झाले. दरम्यान, भोसरीचे अपक्ष आमदार लांडगे यांनी भाजपशी ‘घरोबा’ केला. विशेष म्हणजे, शिरुर लोकसभा निवडणूक लढविण्याची मनिषा असलेल्या आमदार लांडगे यांनी बैलगाडा मालकांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करण्यास सुरूवात केली. भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आमदार लांडगे यांना पद्धतशीर ‘प्रमोट’ केले. त्यामुळे बैलगाडा आंदोलनाच्या यशावरुन खासदार आढळराव पाटील आणि आमदार लांडगे यांच्यामध्ये श्रेयवाद रंगू लागला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. त्याची चर्चा राज्यात होवू लागली.
दरम्यान, खासदार आढळराव पाटील यांनी भाजपची कुटनिती ओळखली. सत्ताधारी भाजप बैलगाडा शर्यतीचे श्रेय कदापि आपल्याला देणार नाही, याची जाणिव झाल्याने खासदार आढळरावांनी चाकणमध्ये (दि.२८ ऑक्टोबर) राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार केला. या आंदोलनाची सर्व तयारी जय्यत करण्यात आली. खासदार आढळराव पाटील यांनी स्वत: पुढाकार घेवून हे आंदोलन सर्वपक्षीय नेत्यांचे असेल, असे आवाहन केले. त्यासाठी शिरुरसह पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना आणि कट्टर विरोधकांना निमंत्रणही धाडले. सोशल मीडियावर संबंधित पत्रांचे ‘मार्केटिंग’ही करण्यात आले. त्याद्वारे बैलगाडा शर्यती सुरु करण्यात आलेल्या अपयशाचे खापर सत्ताधारी भाजपवर फोडण्याचे मनसुबे होते.
मात्र, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि खासदार आढळराव पाटील यांचे प्रतिस्पर्धी दिलीप वळसे-पाटील व भोसरीचे माजी आमदार विलास लांडे या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. त्यामुळे खासदार आढळराव पाटील यांचे आंदोलन एकाकी झाले.
आमदार महेश लांडगेंनी मनसुबे उधळले!
सर्वपक्षीय नेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याची रणनिती केली होती. कट्टर प्रतिस्पर्धी आमदार लांडगे आंदोलनात सहभागी झाले. तर त्यांना पद्धतशीर ‘कॉर्नर’ करुन बैलगाडा मालक आपल्या बाजुने आहेत, असे ‘ब्रँडिंग’ करायचे किंवा सरकारवर कडाडून टीका करुन आमदार लांडगेंची नाकाबंदी करायची, असे नियोजन होते. मात्र, आंदोलनात वेगळेच चित्र पहायला मिळाले. आमदार लांडगे आंदोलनात सहभागी झाले. यावेळी झालेल्या भाषणात लांडगेंनी थेट सरकारची बाजू घेतली. त्यामुळे खासदार आढळराव पाटील यांची चांगलीच अडचण झालेली दिसत होती.
आमदार लांडगेंनी आंदोलनाचा रोख वळवला..!
राज्य सरकारने न्यायालयात प्रभावीपणे बाजू न मांडल्यामुळेच बैलगाडा शर्यतीला खोडा बसला, अशी गर्जना करीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा मालकांचे संघटन सरकार विरोध करण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. राज्यव्यापी आंदोलनाला सुरूवात करून सरकारविरोधी जनभावना निर्माण करण्याचे ‘प्लॅनिंग’ होते. मात्र, तत्पूर्वीच आमदार लांडगे यांनी भोसरी गाडामालकांची बैठक घेतली. त्या बैठकीत बैलगाडा मालकांचा खरा शत्रू ‘पेटा’ ही संस्था आहे. सरकार बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करीत आहे, असे बैलगाडा मालकांना पटवून दिले. विशेष म्हणजे, चाकणमधील आंदोलनात झालेल्या जाहीर सभेमध्येसुद्धा आमदार लांडगे यांनी सरकारची बाजू घेतली. सरकार न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडणार असल्याचे ठणकावून सांगितले. त्यामुळे सरकारविरोधात असलेला आंदोलनाचा रोख ‘पेटा’ विरोधात करण्यात आमदार लांडगे यशस्वी झाले. त्यामुळे आमदार लांडगे यांच्या निमित्ताने बैलगाडा मालकांचे आंदोलन भाजपने ‘हायजॅक’ केले, अशी चर्चा ग्रामीण भागात रंगली आहे.