पिंपरी (Pclive7.com):- गेल्या आठ वर्षांपासून महापालिका प्रशासनाच्या सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या ताथवडे येथील शाळेचा वनवास अखेर संपला आहे. शाळेच्या महापालिका हस्तांतराला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये २००९ साली ताथवडे गावचा समावेश करण्यात आला. त्याचवेळी या गावातील जिल्हा परिषदेची शाळा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची गरज होती. तत्कालीन नगरसेविका यमुनाताई पवार यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांनी पाठपुरावा सुरू केला होता. पण, शाळेतून बदली झालेल्या काही शिक्षकांनी राज्य शासनाच्या निर्णयला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळली असून, राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दवाढीमुळे महापालिका क्षेत्रात मौजे ताथवडे (ता. मुळशी, जि. पुणे) या गावचा गावठाणासह समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सर्वे. क्र.१ ते १७६ मधील जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत असलेली प्राथमिक शाळा, शाळेची जमीन, इमारती, अभिलेख, साधनसामग्री यासह सर्व स्थावर जंगम मालमत्ता महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करावी, असा निर्णय महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि.३० ऑक्टोबर २०१३ रोजी दिला होता. त्या निर्णयामध्ये शाळा हस्तांतरणाबाबत जिल्हा परिषदेच्या (सीएसएस) फंडातून जी मालमत्ता निर्माण केली आहे, ती मालमत्ता हस्तांतरीत केल्यानंतर त्याचे मूल्य संबंधित महापालिका प्रशासनाने जिल्हा परिषदेला देणे आवश्यक आहे. शाळांचे हस्तांतरण करताना सध्या सदर कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना वर्ग करण्यात यावे. तसेच, खासगी प्राथमिक शाळांचे नियंत्रण, पर्यवेक्षण व अधीक्षण पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे सोपवण्यात यावे, अशा अटींचा समावेश केला होता.
विद्यार्थी-पालकांना दिलासा…
दरम्यान, शाळेतून त्यावेळी बदली झालेल्या काही शिक्षकांनी राज्य शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका २०१३ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यामुळे शाळेतील पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणारा सुविधांवर निर्बंध येवू लागले होते. परिणामी, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. याची दखल घेवून ताथवडे येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांनी जिल्हा परिषद, महापालिकास्तरावर पाठपुरावा सुरू केला. स्थानिक विद्यार्थींचे नुकसान होवू नये. यासाठी स्वखर्चातून शाळेला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, उन्हाळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. त्यावेळी सकारात्मक पुढाकार घेवू पिण्याच्या पाण्याची सुविधा करुन दिली होती. सध्यस्थितीला शाळेत एकूण १४ शिक्षक आहेत. तसेच, ताथवडे परिसरातील तब्बल ५२२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे.