पिंपरी (Pclive7.com):- माझ्याबरोबर कोणता नेता नसला तरी माझ्याबरोबर नागरिक आहेत. जनतेला गृहीत धरून चिंचवड विधानसभेचे राजकारण केले गेले. पाणी, अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्न दोनही पक्षांनी सोडविला नाही. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदु समजून काम करायचे हे राज्यकर्ते विसरले आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर नागरिक नाहीत. पण, आमच्याबरोबर आहेत. गृहित धरल्याने भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसला जनता पोटनिवडणुकीत धडा शिकवेल आणि मला मोठा मताधिक्याने निवडून देईल, असा आत्मविश्वास अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केला. माझ्यासमोर असलेल्या दोन उमेदवारांपैकी एक जण पाच वर्षात कधी महापालिकेत स्मार्ट सिटीच्या विरोधात बोलल्याचे आठवत नाही, असेही राहुल कलाटे म्हणाले.
चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक शिट्टी या चिन्हावर लढत असलेले राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची रावेत येथे जाहीर सभा झाली. या सभेत कलाटे यांनी जोरदार भाषण केले. ते म्हणाले, गेल्या महिन्याभरात ज्या काही घडामोडी झाल्या. त्याचे साक्षीदार जनता आहे. ज्यांना सर्वात जास्त विश्वासात घ्यायला हवे होते. त्यांना गृहीत धरून चिंचवड विधानसभेचे राजकारण केले गेले. त्याचे केंद्रबिंदू कोण असाल तर तुम्ही सर्वजण आहात. 2014 ला मी शिवसेनेचा उमेदवार होतो. त्यावेळी तुम्ही मला 65 हजार मते दिली. 2019 ला या मतदारसंघात कोणीही लढायला तयार नव्हते. प्रचंड दबावाखाली या मतदारसंघातील नागरिक होते. भाजपची मोठी लाट लोकसभेनंतर जाणवत होती. मला एक लाख 12 हजार मतांचे पाठबळ दिले.
मला पाठिंबा दिलेले म्हणत आहेत कि ती मते आमची होती. परंतु अॅड. प्रकाश आंबेडकर कधीही असे म्हणाले नाहीत कि ती मते आमची होती. ती मते जनतेची होती असेच ते म्हणतात. या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. आता भाजपची सत्ता आहे. मग कोणता प्रश्न सुटला? अनधिकृत बांधमकामाच्या प्रश्नावर सर्वजण सत्तेत आले. सुटला का तो प्रश्न ? ज्यावेळी प्राधिकरणाच्या जमिनी ‘पीएमआरडीए’ मध्ये गेल्या. जो विकसित भाग आहे, तो महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. आम्ही सांगत होतो कि हे हस्तांतर करताना संबंधित घरे नागरिकांच्या नावावर करा. पण आजही हा प्रश्न सुटलेला नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून सांगवी ते मामुर्डीपर्यंत सर्व ठिकाणी पाणी प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 24 तास पाणी देऊ असे सांगितले होते. पण, दररोज दिले. भाजप सत्तेत आला. त्यांनी पाणीपुरवठा दिवसाआड केला. सगळीकडे पाणी टंचाई असल्याने कृत्रिमपणे हा पाणी प्रश्न निर्माण केला का? एकीकडे टँकर माफिया आहेत. पायाभूत सुविधा उपलब्ध असताना पाण्याचा स्रोत वाढवून मिळत नाही. पाण्याची 40 टक्के गळती होते. याचा अर्थ 40 टक्के भ्रष्टाचार आहे, असेही कलाटे म्हणाले.
महापालिकेत पाच वर्षे गटनेता म्हणून काम केले. त्यावेळी प्रत्येक चुकीच्या कामाला कडाडून विरोध केला. ज्या पद्धतीने हे शहर विकसित होत आहे. लोकांच्या मूलभूत प्रश्नांपासून दोनही पक्ष दूर गेले आहेत. फक्त ठेक्यांमध्ये यांनी पाच वर्षे काढली, अशी जोरदार टीका कलाटे यांनी केली. ठेकेदार आमदारांचे बगलबच्चे आहेत. राष्ट्रवादीचे एक नेते शरीराने राष्ट्रवादीबरोबर आहेत. पण, मनाने आपल्यासोबत आहेत. हे नेते नेहमी सांगतात या शहराचे आमदार चार-दहा बगलबच्चांचे कल्याण करतात आणि हजारो लोकांचे वाटोळे करायचे अशी यांची मानसिकता आहे. हे थांबविण्याचे काम आम्ही केले.”
कलाटे पुढे म्हणाले, ‘महापालिकेच्या शाळांमधील बहुतेक मुले वाहन चालक, शिपाई म्हणून काम करतात. दहावीनंतर ही मुले शिकू शकत नाहीत. त्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या 700 च्या जागा 7 हजार करा, हे मी महापालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत सांगत आहे. पालिकेच्या शाळा या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना जोडल्यास त्यांच्याकडे कौशल्य असेल. त्यावेळी ते स्वतःचे शिक्षण स्वतः घेऊ शकतील. महापालिकेच्या इमारतीमागची चार एकर जागा आम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कामासाठी देऊ केली होती. पण, कालच मला एका अधिकाऱ्याने सांगितले की ती जागा आता अग्निशामक दलाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी ठेवतोय. मी त्यांना सांगितले तुम्ही 2 मार्च पर्यंत थांबा. ती जागा आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलाच घेऊ.”
तू लढू नको असे मला काहींनी सांगितले. पण, मी म्हणालो तुम्ही जर निवडणूक बिनविरोध करणार असाल. तर मी लढणार नाही. पण, तसे करणार नसाल तर मला लढावे लागेल. बंडखोरी तुम्ही केली. तुमचे सातत्य नाही. 2009 ला या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. 2023 ला ही अपक्षच निवडून येणार आहे. वाकड, पुनावळे परिसरात 100 कोटी रुपयांचे रस्ते करायचे मी ठरविले. त्यावेळी मतदानाच्या जोरावर भाजपने हे रस्ते करायचे नाकारले. पण, हे रस्ते आम्ही राज्य सरकारकडून मंजूर केले. आज ते रस्ते पूर्णत्वास येत आहेत. महापालिकेची सीबीएसई बोर्डाची पहिली शाळा वाकडला बांधत आहोत. आम्ही सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने उभे राहातो म्हणून निवडणुकीला आम्ही उभे राहायचे नाही का? माझ्या विरोधकांच्या प्रचाराला पिंपरी, भोसरी, मावळ येथून लोक धरून आणावे लागतात. मतदारसंघाचे भवितव्य ठरवत असताना वारस निवडायचा अधिकार कुणाला आहे ? हा वारस निवडायचा अधिकार नागरिकांना आहे.
जर तुम्ही मला शिट्टीचे बटन दाबून निवडून दिले. तर, एकही कार्यकर्ता प्रकाश आंबेडकर यांच्याकडे गा-हाणे घेवून येणार नाही की राहुल आमचे प्रश्न सोडवीत नाही. कोविडमध्ये 24 हजार लोकांना आम्ही मदत केली. चार स्वयंपाकघर चालविले. आज निवडणूक आली कि महिनाभरात उमेदवार तयार होतात कि आम्हाला आमदार व्हायचंय. 2014 पासून आम्ही काम करतोय. पुनावळ्यातील कचरा डेपोच्या जागेवर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची आमची मागणी आहे. पुनावळ्यातील नागरिकांसाठी निगडीतून 28 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. हे सर्व करण्यासाठी तुमच्यातील आमदार हवा. माझ्याबरोबर कोणता नेता नसला तरी माझ्याबरोबर नागरिक आहेत. माझे मनोबल उंचावण्याचे काम आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी केले. यापुढे महापालिकेची निवडणूक अॅड. प्रकाश आंबेडकर यांना विचारात घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही, असेही कलाटे म्हणाले.