पुणे (Pclive7.com):- ग्रामीण भागातील कला कौशल्यांना महाखादीद्वारे हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. ग्रामीण उद्योग वाढीसाठी त्याला आधुनिकीकरणाची जोड देऊन ‘महाखादी’ ब्रँड म्हणून विकसीत करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण उद्योग वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून शिवाजीनगर येथील हातकागद संस्थेच्या आवारात स्थापन करण्यात आलेले राज्यातील पहिले महाखादी विक्री केंद्र आणि महाखादी ग्रामीण कारागीर संग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट, उद्योग मंत्री सुभाष देसाई, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, खादी व ग्रामोद्योग मडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, खासदार अनिल शिरोळे, आमदार भिमराव तापकीर, विजय काळे, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रिचा बागला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,महात्मा गांधींनी ग्रामीण उत्पादनांच्या कौशल्य वृध्दीसाठी कारागिरांना प्रोत्साहित केले पाहिजे असे सांगितले आहे. आधुनिकीकरणाची जोड पारंपारिक कलेला देऊन ग्रामीण कारागिरांनी निर्माण केलेल्या उत्पादनांना स्वतंत्र ओळखमिळवून ग्रामीण भागातील कलाकौशल्य महाखादी ब्रँडद्वारे सर्वत्र पोहोचेल. एके काळी गरिबाचे वस्त्र म्हणून वापरली जाणारी खादी सध्याच्या काळात लोकप्रिय झाली आहे. येथे उभारण्यात आलेल्या महाखादी ग्रामीण कारागीर संग्रहालयामुळे ग्रामीण उद्योजकांना आत्मसन्मान मिळेल.लोकप्रतिनिंधीनी महाखादी विक्री केंद्र स्थापन करण्यासाठीसहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या भाषणात महाखादी विक्री केंद्र पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने प्रयत्न करावे, असे सांगितले. मंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया यांनी महाखादी विक्री केंद्र व संग्रहालय स्थापनेचा हेतू विषद केला.
कार्यक्रमाला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर,ग्रामीण भागातील कारागिर, कलाकार, तंत्रज्ञ मोठया संख्येने उपस्थित होते.