पिंपरी (Pclive7.com):- पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महामेट्रोचे दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. काम सुरू असताना, अडथळा ठरणारे वृक्ष काढणे भाग पडत आहे. या वृक्षांचे नुकसान होऊ नये, या करिता वृक्ष वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. परंतू या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची जबाबदारी महामेट्रोच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतली आहे. प्रायोगिक तत्वावर वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात दहा वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. या ठिकाणी ४० वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे उपव्यवस्थापक भानुदास माने यांनी दिली.
एसटी आगाराच्या आवारात सकाळी प्रायोगिक तत्वावर दहा वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. सर्वसाधारणपणे केले जाणारे पुनर्रोपण आणि जागतिक स्तरावर मान्य केलेले वृक्ष पुनर्रोपण अशा दोन पद्धतीचा अवलंब केला आहे. पुनर्रोपण केलेले वृक्ष १०० टक्के जगतील याची दक्षता घेतली जाणार आहे. पिंपरी चिंचवड परिसरात किमान तीन आणि पुणे परिसरात किमान ३ हजार वृक्षांचे रोपण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. आळंदी-दिघी येथेही वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. पिंपरी ते हॅरिस पुलापर्यंत १३५ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे. प्राधिकरणाने आकुर्डी येथे पाच एकर क्षेत्र उपलब्ध करून दिले आहे. तेथे १२५ वृक्षलागवड केली जाईल. एकूण ६०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. मेट्रो मार्गावर तीन ते चार वर्षापूर्वीची २०० झाडे आहेत. त्यातील मार्गात अडथळा ठरणाऱ्या ६० वृक्षांचे पिंपरीतील गुलाबपुष्प वाटिकेत पुनर्रोपण केले आहे.