पिंपरी (Pclive7.com):- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार राहुल गांधी यांनी स्विकारल्यामुळे देशभरातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. राहुल गांधींपुढे जरी अनेक आव्हाने असली तरी ते अहिंसेच्या तत्वाने पुरोगामी विचारांचा वसा पुढे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पाठ बळावर पुढील आव्हानांवर मात करतील असा विश्वास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केला.
शनिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार राहुल गांधी यांनी स्विकारला. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, प्रदेश सचिव बिंदू तिवारी, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, शहर सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, प्रदेश मागासवर्गिय सेलचे उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सज्जी वर्की, तुकाराम भोंडवे, राजन नायर, संदेश नवले, आबा खराडे, गौरव चौधरी, कुंदन कसबे, चंद्रशेखर जाधव, शोभा कोराटे, मलीना दास, मेहताब इनामदार, दिलीप पांढारकर, पांडूरंग जगताप, किशोर कळसकर, आण्णा कसबे, भास्कर नारखेडे, हिरा जाधव आदी उपस्थित होते.
सचिन साठे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे मंत्रीमंडळाचे सदस्य जन मानसात संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्य करुन जाती, धर्मात तेढ निर्माण करीत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे कार्यकर्ते महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वांचा देशभर प्रचार प्रसार करतील. देशात पुन्हा पुरोगामी विचार वाढवून २०१९ ला सत्ता बदल करतील. सोनिया गांधी ज्यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या त्यावेळी देशातील फक्त तीन राज्यात काँग्रेसची सत्ता होती. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर देशातील नागरिकांनी विश्वास व्यक्त केला आणि देश काँग्रेसमय झाला. तीच परिस्थिती पुढील वर्षात येणार आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीत राहुल गांधी यांच्या वाढलेला जनसंपर्क व प्रभाव पाहुन हतबल झालेल्या पंतप्रधानांनी ५० जाहीर सभा घेतल्या. तर सर्व केंद्रीय मंत्रीमंडळ आणि देशातील डझनभर मुख्यमंत्री गुजरातमध्ये तळ ठोकून होते. याचाच अर्थ राहुल गांधींचे नेतृत्वाने भाजपाची पायाखालची वाळू सरकली आहे. सोनिया गांधी यांनी निस्सिमपणे देशाची सेवा केली आणि शेवटपर्यंत त्या काँग्रेसचे काम करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच देशातील जनता सत्ता बदलाचा आता कौल देईल. असाही विश्वास सचिन साठे यांनी व्यक्त केला.