पिंपरी (Pclive7.com):- देशाच्या सीमेवरील वाढत असलेली घुसखोरी, दहशतवादी तसेच आतंकवादी हल्ले यापासून देशातील नागरिकांना संरक्षण देण्यासाठी सीमेवरील जवान तत्पर आहेत. परंतु, देशातील विविध शहरांमध्ये अशा प्रकारच्या वाढत्या हल्ल्यांपासून प्रत्येक नागरिकाला स्वतःचे रक्षण करता यावे. या दृष्टीकोनातून देशातील शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांस शिक्षणासोबत लष्करी प्रशिक्षण देणे अनिवार्य करावे, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत एका खासगी विधेयकाद्वारे केली आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये देशातील सीमेवर होणारे दहशतवादी हल्ले, महत्वाच्या शहरांमध्ये होणा-या छोट्या मोठ्या चकमकी वाढत आहेत. अशा हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशा प्रकारचे हल्ले शेजारील देशांमध्ये सुद्धा होत असतात. यासाठी तेथील सरकारकडून शाळा, महाविद्यालयांमध्येच विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण पुरविले जाते. त्यामुळे नागरिकांना स्वतःचे व देशाचे रक्षण करणे सोपे जाते. परंतु, अशा प्रकारचे शाळा महाविद्यालयांमध्ये लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या देशात कोणतीच तरतूद नाही. जर अशा प्रकारचे लष्करी प्रशिक्षण भारतातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना या वयातच दिले गेले. तर, त्यांना स्वतःचे व देशाचे रक्षण करणे सोपे जाईल. तसेच येणा-या परस्थितीचा सामना करण्यास त्यांना या प्रशिक्षणाची मदत होईल.
लष्करी प्रशिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, बंधुत्व आणि एकता अशा भावना जोपासण्यास मदत होईल. त्याचबरोबर देश सेवेसाठी असलेल्या लष्करी विभागाच्या सशस्त्र सेनेमध्ये भरती होण्यास भविष्यात अनेक जवान तयार होतील, असे खासदार बारणे यांनी या खासगी विधेयकामध्ये नमूद केले आहे.