मुंबई (Pclive7.com):- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. आज त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले..
पुढील 50 वर्षांचा विचार आपल्याला करायचा असतो. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली होती. फडणवीसांना मी वाटाघाटीत मला पाडू नका असं सांगितलं. मला राज्यसभा आणि विधानपरिषदी नको सांगितलं. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. जर अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेंचं तोंड आहेच. मनसे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर करत आहे. मला इतर काहीही अपेक्षा नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
आपला देश 10 वर्षांनी पुन्हा वयस्कर होईल. नरेंद्र मोदींनी तरुणांकडे लक्ष दिलं पाहिजे. देशात 6 लाख उद्योगपती देश सोडून गेल्याचं लोकसभेत सांगण्यात आलं. हे आता होता कामा नये. महाराष्ट्र जो कर भरतो त्याचा मोठा वाटा मिळाला पाहिजे, अशी भूमिका देखील राज ठाकरे यांनी मांडली आहे. संपूर्ण देशाला मोदींकडून अपेक्षा आहे. आगामी निवडणूक खड्ड्यात जाणार की वर हे भविष्य ठरवणारी आहे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या राजकीय रस्सीखेचावर देखील भाष्य केलं. तसेच राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होणार का? या चर्चित असलेल्या विषयावर देखील आपली भूमिका व्यक्त केली. मला शिवसेनेचा प्रमुख व्हायचं असेल तर तेव्हाच झालो असतो. मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं, मी पक्ष फोडणार नाही, मी स्वत:चा पक्ष काढेल. मी आजही सांगतोय, मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.