पिंपरी (Pclive7.com):- जगाच्या इतिहासात भुतो न भविष्यती राजा शिवाजी महाराजांसारखा सर्वगुणसंपन्न, पराक्रमी राजा पुन्हा होणे अशक्यच आहे. सर्व बाबींचा विचार करून त्यानुसार स्वराज्याची कार्यप्रणाली चालविणारे राजे शेतक-यांचे कैवारी होते. आजची प्रशासन व्यवस्था पाहून शिवबांची आठवण झाल्या शिवाय रहात नाही. शिवशाही” काळात एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही, किंबहूना तशी परिस्थिती उद्भवू न देणारे जगातील सर्वाेच्च आदर्शांचा मानबिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत. असे प्रतिपादन अमित बच्छाव यांनी केले.
निगडी,भक्ती-शक्ती समुह शिल्प येथे शिवजयंती विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव बोलत होते. जगदगुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बच्छाव म्हणाले,”आज शिवरायांच्या नावावर मत मिळविली जातात, निवडणूकांपुरता त्यांच्या नावाचा उदो-उदो केला जातो. परंतू राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराज, त्यांची विचारप्रणाली समजून घेतली आहे का? हा ही एक मोठा प्रश्न आहे. आज मंत्रालयात आत्महत्या केल्या जात आहेत. ज्या ठिकाणी न्यायाच्या अपेक्षेने शेतकरी येतो, तेथे त्यांची महात्वाकांक्षाच का संपतेय? का असे घडतेय. आज शेकडो वर्षांनी पुन्हा एकदा शिवबांची शासनप्रणाली समजून घेणे गरजेचे आहे.
आज महाराष्ट्र शेतक-यांच्या आत्महत्येत देशात आघाडीवर आहे. शेतकरी आत्महत्यांना दुष्काळाचे कारण देणा-या राज्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवावे की शिवबांच्या काळातही दुष्काळ पडत होता. परंतू त्या परिस्थितीत शिवबांनी शेतक-यांना एक नवचैतन्याची ताकद देऊन शेतक-यांच्या पाठीशी ते खंबीरपणे थांबले होते. त्या काळात एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही. आज त्यावर सरकारने विचार करून शेतक-यांच्या हाल-अपेष्ठा जाणून घेऊन उपाययोजनांची आखणी केल्यास राजांना ख-या अर्थाने अभिवादन ठरेल. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.