पिंपरी (Pclive7.com):- अखंड लोकशाही गुण्यागोविंदाने वृध्दींगत व्हावी म्हणून घटना समितीने राजकीय सत्तेवर कायद्याने मानवी हक्क अबाधित ठेवणारी बंधने घातली आहेत. सत्तास्थान हे लोककल्याणाचा एक मार्ग आहे. त्यामुळे सत्ताधा-यांनी आपले काम लोकशाही पध्दतीने चालले आहे कि नाही, याचे कठोर आत्मपरिक्षण नित्य केले पाहिजे. असे लोककल्याणाला मार्गदर्शक ठरणारे विचार यशवंतराव चव्हाण यांचे होते. आज त्यांच्या विचारांचे सर्व सत्ताधा-यांनी चिंतन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले.
माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते आज वल्लभनगर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सरचिटणीस सज्जी वर्की, हिरा जाधव, शोभा कोराटे, हुरबानो शेख, इर्शाद शेख, वसंत मोरे, मकर यादव, अनिरुध्द कांबळे, किसन भालेकर, सुनिल राऊत, तुषार पाटील, माधव पुरी, श्रीरंग सरपते आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, १२ मार्च १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र गावात जन्मलेले यशवंतराव चव्हाण हे उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी, अभ्यासू व्यक्तीमत्व, रसिक व साहित्यिक होते. युगांतर, सह्याद्रिचे वारे, कृष्णाकाठ, ऋणाबंध हे त्यांचे ग्रंथ आजही महाराष्ट्रातील अभ्यासकांना मार्गदर्शक आहेत. महाराष्ट्राच्या औद्योगिकी करणाचा पाया यशवंतराव चव्हाण यांनी उभारला. आज शेती आणि उद्योगात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे यांचे श्रेय यशवंतराव चव्हाण यांचे आहे.