पिंपरी (Pclive7.com):- खान्देश मराठा मंडळ पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हा परिसर, प्राधिकरण, निगडी, येथे संस्थेचा ३९ वा वर्धापन दिन हा १ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्याध्यक्ष रमाकांत पाटील, अनिल पाटील, शशिकांत बेहेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व वक्ते ह.भ.प. किसन महाराज पांडुरंग चौधरी सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने (जय जय महाराष्ट्र माझा) करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.
ह.भ.प. किसन महाराज पांडुरंग चौधरी म्हणाले की, ३९ वर्षापूर्वी लावलेले खान्देश मराठा मंडळाचे हे छोटेसे रोपटे हे आज वटवृक्षांमध्ये रूपांतरित झाले आहे. त्याचबरोबर त्यांनी खान्देश मधील कवी, लेखक, क्रांतिकारक, सामाजिक/राजकीय कार्य व तसेच खान्देश मधील बोलीभाषा ‘अहिराणी” या विषयावर सविस्तर प्रबोधन केले. १ मे हा कामगार दिवस व महाराष्ट्र दिवस असल्यामुळे त्यावरही प्रबोधन केले. पिंपरी चिंचवड शहर ही संतांची भूमी आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म देखील याच पुणे जिल्ह्यात झाला याचाही त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला.

खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष हेमंत चव्हाण यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. खान्देश सुपुत्र कवी/लेखक अभिमन्यू गिरधर सूर्यवंशी निमडाळेकर यांचे देखील मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच खान्देश मधील उच्चशिक्षित UPSC/MPSC/DOCTOR अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

मंडळातील मागील वर्षी मयत झालेल्या ज्ञात-अज्ञात सभासदांना व त्याचप्रमाणे पहेलगाम येतील भ्याड हल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप हा खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष हेमंत चव्हाण यांच्या भाषणाने झाला. यावेळी स्वरांगणा दृष्टीहीन संस्था, पुणे यांचा सुमधुर गाण्यांचा आर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. आलेल्या सर्व मान्यवरांनी जुने मराठी/हिंदी गाण्यांचा आनंद घेतला व त्यानंतर स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत बेहेरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अनिल पाटील यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देसले यांनी केले. तसेच प्रमुख पाहुणे व खान्देश मराठा मंडळातील सर्व अजीव सदस्यांचे आभार रमाकांत पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी खान्देश मराठा मंडळातील संचालक हेमंत चव्हाण, प्रदीप शिंदे, किशोर पाटील, मनोहर पाटील, राजेंद्र देसले, हेमंत पाटील, मधुकर पगार, जितेंद्र नारायण पाटील, सुरेश पाटील, जितेंद्र शांताराम पाटील, मोतीलाल पाटील, रमाकांत पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत बेहेरे, अनिल पाटील, अविनाश पाटील, दिपालीताई पाटील, राखीताई निकम व मार्गदर्शक भगवान केशव पाटील, भिकन दयाराम पाटील, माधव बाबुराव पवार, संतोष दामोदर पाटील, अनिल फकीरा सावंत, सयाजीराव रामराव पाटील यांचे मोलाचे योगदान मिळाले.