मुंबई (Pclive7.com):- निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा (ईव्हीएम) वापर बंद होणार नसेल तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. फेसबुक पेजवर त्यांनी हे पत्र शेयर केले आहे.
ईव्हीएम मशीन्समध्ये गडबड आहे हे आपण खूप आधीपासून ऐकत आहोत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याची कुजबुज सुरु झाली. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत या दाव्याला पुष्टी मिळत गेली. असंख्य मतदारसंघांमध्ये तुमच्या माझ्या पक्षाच्या नगरसेवक, आमदारांनी चांगली कामगिरी करुन देखील पराभव झाला. काही ठिकाणी उमेदवारांना शून्य मत मिळाली हे पटूच शकत नाही.
येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान ईव्हीएम मशीन हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर अशा पद्धतीने निवडणुका होणार असतील तर निवडणुका का घ्यायच्या? लोकशाहीत मतदार हाच अंतिमत: राजा असतो पण याच तत्वाला हरताळ फासण्याचे काम मागची ३ ते ४ वर्ष सुरु आहे.
हा विषय गंभीर आहे. जो पर्यंत निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट मशिन्स किंवा मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध करुन देत नाही तो पर्यंत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालावा. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनवरून राजकारण पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.